दुबईत झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारताने अटीतटीच्या लढाईत बांगलादेशवर ३ गडी राखून मात केली. या स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात झालेल्या बरोबरीचा अपवाद सोडला, तर एकही सामना भारताने गमावलेला नाही. चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला अवघ्या २२२ धावांमध्ये रोखलं. यानंतर धावांचा पाठलाग करताना, मधल्या काही षटकांमध्ये भारताने सामन्यावरची आपली पकड ढिली केली होती, मात्र जाडेजा-भुवनेश्वर कुमार आणि यानंतर केदार जाधव-कुलदीप यादव जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दरम्यान या सामन्यात तब्बल १४ विक्रमांचीही नोंद करण्यात आली.

१ – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मेहदी हसनने बांगलादेशसाठी फलंदाजीत डावाची सुरुवात करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

१ – लिटन दासने झळकावलेल्या १२१ धावा या बांगलादेशी फलंदाजाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केलेल्या सर्वोच्च धावा ठरल्या आहेत.

१ – अंतिम सामन्यात महेंद्रसिंह धोनीने दोन फलंदाजांना यष्टीचीत करुन माघारी धाडलं. या कामगिरीसह आशिया चषकात सर्वाधिक यष्टीचीत बळी घेणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत धोनी पहिल्या स्थानावर पोहचला आहे. धोनीच्या खात्यात १२ तर श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर १० यष्टीचीत बळी आहेत.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 Final : महेंद्रसिंह धोनीचा आणखी एक विक्रम, दिग्गज यष्टीरक्षकांच्या पंक्तीत मिळवलं स्थान

१ – बांगलादेशकडून फलंदाजी आणि गोलंदाजीत डावाची सुरुवात करणारा मेहदी हसन पहिला खेळाडू ठरला आहे.

१ – बांगलादेशचा अपवाद वगळता, आतापर्यंत केवळ इंग्लंडचा संघ सलामीच्या फलंदाजांनी शतकी भागीदारी केल्यानंतरही २०० पेक्षा कमी धावसंख्येवर बाद झाला आहे. (इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज – इंग्लंड १९४ सर्वबाद; १९७९ विश्वचषक)

२ – कर्णधार या नात्याने पहिल्या चारही मालिका जिंकणाऱा रोहित शर्मा भारताचा दुसरा कर्णधार. याआधी राहुल द्रविडने ही करामत करुन दाखवली आहे.

३ – अलोक कपाली आणि मुशफिकूर रहिम यांच्यानंतर भारताविरुद्ध शतक झळकावणारा लिटन दास तिसरा बांगलादेशी फलंदाज ठरला आहे.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 Final : अंतिम सामन्यातील बांगलादेशच्या अपयशाची मालिका कायम

३ – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८०० बळी घेणारा महेंद्रसिंह धोनी तिसरा यष्टीरक्षक.

३ – ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यानंतर ७०० वा आंतरराष्ट्रीय सामना जिंकणारा भारत तिसरा देश ठरला आहे.

४ – शिखर धवनने मालिकेत पटकावलेल्या ३४२ धावा या आशिया चषकातील भारतीय फलंदाजाने केलेल्या सर्वोच्च कामगिरीच्या यादीत चौथ्या स्थानावर.

अवश्य वाचा – IND vs WI : भारतीय संघांची घोषणा; शिखर धवन बाहेर, पृथ्वी शॉ-मयांक अग्रवालला संधी

५ – आशिया चषकाच्या अंतिम फेरीत शतक झळकावणारा लिटन दास पाचवा खेळाडू ठरला आहे.

७ – भारतीय संघाचं हे सातवं आशिया चषक विजेतेपद ठरलं आहे.

६ – भारताविरुद्ध अंतिम सामन्यात लिटन दास आणि मेहदी हसन यांनी केलेली १२० धावांची भागीदारी ही सहावी शतकी भागीदारी ठरली आहे. महत्वाची गोष्टमध्ये याआधी झालेल्या ५ शतकी भागीदाऱ्यांच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

११ – आशिया चषकात आतापर्यंत सलग ११ सामन्यांमध्ये भारतीय संघ अजिंक्य राहिलेला आहे.