Video : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात केदार जाधवने बांगलादेशविरुद्ध विजयी धाव घेत आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदावर सातव्यांदा शिक्कामोर्तब केले. अत्यंत रोमांचक अशा सामन्यात बांगलादेशने स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताला अखेरपर्यंत झुंजवले. मात्र, भारतीयांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर जेतेपद निसटू दिले नाही. गतविजेत्या भारताने सलग दुसऱ्यांदा स्पर्धेत बाजी मारताना सर्वाधिक सातव्यांदा आशिया चषक पटकावला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ४८.३ षटकात २२२ धावा केल्यानंतर भारताने ५० षटकात ७ बाद २२३ धावा करुन रोमांचक विजय मिळवला.

या सामन्यात बांगलादेशचा मोहम्मद मिथुन ज्या पद्धतीने धावबाद झाला, ते अतिशय नाट्यमय ठरले. त्याला धावबाद करण्यात धोनीची चतुराई पुन्हा एकदा कामाला आली. फलंदाजाने मारलेला चेंडू जडेजाने उत्तमपणे अडवला. जडेजा हा चेंडू धोनीकडे फेकणार होता. पण योग्य वेळी धोनीने त्याला चेंडू नॉन-स्ट्राईककडे फेकण्यास सांगितला आणि चहलने हा चेंडू पकडत मिथुनला बाद केला.

दरम्यान, या सामन्यात धोनीने एक विक्रमही केला. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात, बांगलादेशविरुद्ध धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतला यष्टींमागचा ८०० वा बळी मिळवला. सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत धोनी आता तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीमध्ये पहिल्या स्थानी मार्क बाऊचर ९९८ बळींसह तर दुसऱ्या स्थानी अॅडम गिलख्रिस्ट ९०५ बळींसह कायम आहेत.