इंग्लंडमध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर येणार आहेत. १५ सप्टेंबरपासून युएईत सुरु होणाऱ्या आशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तान यांचा सामना रंगणार आहे. या स्पर्धेसाठी दोन्ही संघांचा हाँग काँग सह अ गटात समावेश करण्यात आलेला आहे. मात्र पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक या सामन्याला अवास्तव महत्व देण्यास तयार नाहीये.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 : भारतीय संघासाठी स्पर्धेच्या आयोजनात बदल

आयसीसीच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत शोएब मलिकने आपलं मत मांडलं. “इतर संघांप्रमाणेच भारताविरुद्धचा सामना हा एक सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्याचं अवडंबर माजवून त्याच्या दबावाखाली येणं टाळायला हवं. दोन देशांमधील क्रिकेट सामन्यांना नेहमी प्रेक्षकांची पसंती असते. त्यामुळे प्रत्येक खेळाडू या सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत हिरो बनण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र याच्यात वावगं असं काहीच नाही. फक्त भारताविरुद्ध सामन्याला अधिक महत्व देणं मला योग्य वाटत नाही.”

बीसीसीआयच्या दबावामुळे यंदाच्या आशिया चषकाचं ठिकाण पाकिस्तानवरुन युएईला हलवण्यात आलं होतं. याबद्दल प्रश्न विचारला असता शोएबने सावध भूमिका घेतली. दुबई किंवा अबुधाबीत होणाऱ्या सामन्यांमध्ये आमच्या संघाला नेहमी फायदा होत आलेला आहे. मात्र कसोटी सामन्यांसाठी या खेळपट्ट्या जास्त पोषक आहेत. मर्यादीत षटकांचे सामने खेळत असताना या मैदानावर अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे पाकिस्तानचा संघ कोणालाही कमी लेखणार नसल्याचं, मलिकने स्पष्ट केलं. १९ सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातला सामना रंगणार आहे.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 : हर्षा भोगले, संजय मांजरेकरांना समालोचकांच्या यादीतून वगळलं