सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार रोहित शर्माने झळकावलेल्या शतकांच्या जोरावर भारताने आशिया चषकात पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात केली आहे. दुबईच्या मैदानात Super 4 गटात खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने पाकवर ९ गडी राखून मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं २३८ धावांचं आव्हान भारताने रोहित-शिखरच्या भागीदारीच्या जोरावर सहज पूर्ण केलं. दोन्ही फलंदाजांनी सुरुवातीपासून सावध सुरुवात करत खेळपट्टीवर आपले पाय रोवले. यानंतर दोन्ही खेळाडूंनी पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत रोहित-शिखरने धावा कुटल्या. आपलं शतक झळकावल्यानंतर शिखर धवन चोरटी धाव घेत असताना धावबाद होऊन माघारी परतला. शिखरने १०० चेंडूत ११४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या बाजूने कर्णधार रोहित शर्माने १११ धावांची नाबाद खेळी केली. शिखर धवनला आक्रमक खेळीसाठी सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. अखेरच्या षटकात जसप्रीत बुमराहने केलेल्या माऱ्यामुळे भारताने Super 4 गटात पाकिस्तानचा २३७ धावांवर रोखलं. शोएब मलिकने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर पाकिस्तानने वेळेतच आपला डाव सावरत भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. नाणेफेक जिंकून सामन्यात पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तानची सुरुवात काहीशी अडखळती झाली. पहिले ३ फलंदाज झटपट माघारी परतले, मात्र यानंतर शोएब मलिकने कर्णधार सरफराज अहमदच्या साथीने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. शोएब आणि सरफराजने भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत धावांचा ओघ वाढवला. या भागीदारीमुळे पाकिस्तानने आश्वासक धावसंख्या ओलांडली. शोएब मलिकने ९० चेंडूत ७८ तर कर्णधार सरफराजने ४४ धावांची खेळी केली. मात्र ही जोडी फुटताच, पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा कोलमडला. अखेरच्या फळीत आसिफ अलीने भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र जसप्रीत बुमराहने अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत पाकिस्तानला मोठी धावसंख्या गाठू दिली नाही. भारताकडून बुमराह, चहल आणि कुलदीप यादवने प्रत्येकी २-२ बळी घेतले. यानंतर भारताचा पुढचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.