Asia Cup 2018 Ind vs Pak : क्रिकेटमधील सर्वात हाय व्होल्टेज सामन्यात बुधवारी साखळी सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ८ गडी राखून विजय मिळवला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले १६३ धावांचे माफक आव्हान भारतीय फलंदाजांनी सहज पार पाडले. भुवनेश्वर कुमार, केदार जाधव आणि जसप्रीत बुमराहने केलेल्या माऱ्यासमोर पाकिस्तानचा संघ अवघ्या १६२ धावांमध्ये कोलमडला.

हाँगकाँगवर मात केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने आक्रमक खेळाचं प्रदर्शन केले. काही ठराविक भागीदाऱ्यांचा अपवाद वगळता पाकिस्तानचा डाव आकार घेऊ शकला नाही. केदार जाधवच्या कामचलाऊ गोलंदाजीवर मोठे फटके खेळण्याच्या नादात पाकचे फलंदाज विकेट गमावून माघारी परतले. अखेरच्या फळीत मोहम्मद आमीर आणि फईम अश्रफ यांनी ३७ धावांची छोटेखानी भागीदारी रचत संघाला १५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. पण केदार जाधवने ३ बळी टिपून एक विक्रम रचला.

केदार जाधव याने कर्णधार सर्फराज अहमद याला प्रथम बाद केले. मनीष पांडेने सीमारेषेवर त्याचा उत्तम झेल टिपला. त्यानंतर असिफ अली आणि शादाब खान या दोघांनाही झटपट तंबूत पाठवले. त्यामुळे सातव्या क्रमांकाला गोलंदाजी करताना वन-डे सामन्यात तीन बळी टिपणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी भुवनेश्वर कुमार, बुमराह, पांड्या, चहल, कुलदीप यादव, अंबाती रायडू हा सहा गोलंदाजांनी सामन्यात गोलंदाजी केली होती.

दरम्यान, भुवनेश्वर कुमारनेही ३ गडी बाद केले.