आशिया चषक स्पर्धा संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये खेळवण्यात येणार या गोष्टीवर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. ही स्पर्धा कोठे खेळवली जाणार याबाबत काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. पण अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एमिरेटस क्रिकेट बोर्डाला या स्पर्धेच्या आयोजनाचे अधिकार सुपूर्द केले. त्यामुळे आता ही स्पर्धा युएई मध्ये होणार आहे.

भारतात या स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन करणे शक्य होते. परंतु, पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत सहभागी असल्याने याबाबत साशंकता होती. पाकिस्तानचा संघ भारतात खेळताना सुरक्षेच्या मुद्द्यावरून वातावरण तापू शकते. तसेच त्यामुळे पाकिस्तानच्या संघाला खेळवताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, हे मुद्दे लक्षात घेऊन या स्पर्धांचे आयोजन भारताऐवजी युएईमध्ये करण्यात आले आहे.

BCCI आणि एमिरेटस क्रिकेट बोर्ड यांच्यात या संदर्भात करार करण्यात आला. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आणि एमिरेटस क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष राजे नहयान बिन मुबारक अल नहयान यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.