Asia Cup 2018 IND vs HK : भारताने सलामीच्या लढतीत हाँगकाँगवर २६ धावांनी रडतखडत विजय मिळवला. सलामीवीर निझाकत खान (९२) आणि कर्णधार अंशुमन रथ (७३) यांनी १७४ धावांची सलामी भागीदारी करून भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. पण हे दोघे बाद झाल्यानंतर हाँगकाँगच्या डावाला उतरती कळा लागली आणि भारताने सामना जिंकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खलील अहमदने आणि युझवेंद्र चहलने सर्वाधिक प्रत्येकी ३-३ बळी टिपले. भारताच्या तुलनेत दुबळ्या मानल्या जाणाऱ्या हाँगकाँगच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना रडवले. या दोघांनी १७४ धावांची सलामी भागीदारी केली. त्यामुळे एका क्षणी भारत हा सामना गमावतो की काय, अशी स्थिती होती. मात्र त्यानंतर हे दोघेही पाठोपाठ बाद झाले. निझाकत खानचे शतक ८ धावांनी हुकले. तो तिसऱ्यांदा नववंडीत बाद झाला. तर कर्णधार अंशुमन रथदेखील चुकीचा फटका खेळताना बाद झाला. त्यानंतर मात्र कोणत्याही फलंदाजाला डाव सावरणे जमले नाही. ठराविक अंतराने बळी टिपण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. भारताकडून खलील अहमद आणि युझवेन्द्र चहल यांनी प्रत्येकी ३ तर कुलदीप यादवने २ बळी टिपले. तत्पूर्वी, भारताने ५० षटकात ७ बाद २८५ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून शिखर धवन याने गब्बर खेळी करत शतक ठोकले. त्याने १२० चेंडूत १२७ धावा केल्या. या खेळीत त्याने १५ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली. नाणेफेक जिंकून हाँगकाँग प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात (२३) बाद झाला. मात्र त्यानंतर धवन आणि रायडू या जोडीने चांगली भागीदारी केली. अर्धशतक साजरे केल्यानंतर रायडू ६० धावांवर बाद झाला. शिखर धवनने मोक्याच्या क्षणी शतक झळकावले. त्यानंतर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्यानंतर मात्र भारतीय संघाच्या डावाला गळती लागली. भारताने झटपट तीन बळी गमावले. धवन आणि धोनी बाद झाल्यांनतर पाठोपाठ दिनेश कार्तिकही बाद झाला. इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कम्गहिरी करता आली नाही. त्यामुळे भारताला केवळ २८५ धावांपर्यंत मजल मारता आली. हाँगकाँगकडून किंचित शाहने सर्वाधिक ३, एहसान खानने २, तर एहसान नवाझ आणि एजाज खान यांनी १-१ बळी टिपला.