Asia Cup 2018 : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आशिया चषकामधून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे पांड्याला संघाबाहेर जावे लागले आहे. आता त्यापाठोपाठ भारताला आणखी दोन धक्के बसले आहेत. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर या दोघांनाही स्पर्धेबाहेर व्हावे लागले आहे.

शार्दूल ठाकूर याला मांडीच्या दुखापतीमुळे स्पर्धेला मुकावे लागत आहे. हॉंगकॉंग विरुद्ध झालेल्या सामन्यात तो अत्यंत महागडा गोलंदाज ठरला होता. त्यानंतर त्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संधी देण्यात आली नव्हती. तर अक्षर पटेल हा अंगठ्याच्या दुखापतीने त्रस्त झाला असून त्याला स्पर्धेत या पुढे खेळता येणे शक्य होणार नाही. त्यामुळे या दोन खेळाडूंच्या जागी भारतीय संघात रवींद्र जडेजा आणि सिद्धार्थ कौल या दोघांना स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, पांड्याच्या जागी दिपक चहरची संघात निवड करण्यात आलेली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला माहिती देत वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी करत असताना १८ व्या षटकात हार्दिक पांड्याच्या पाठीला दुखापत झाली होती. यानंतर त्याला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आलं होतं. त्यामुळे पांड्याच्या अनुपस्थितीचा टीम इंडियाला आगामी सामन्यांमध्ये फटका बसण्याची दाट शक्यता आहे.