इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ आशिया चषकासाठी युएईला रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ समोरासमोर भिडणार आहेत. मात्र या स्पर्धेआधीच पाकिस्तानच्या खेळाडूकडून भारतावर दबाव टाकण्यास सुरुवात झालेली आहे. आमच्याविरोधात खेळत असताना भारतीय संघाव दबाव असेल असं वक्तव्य, पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हसन अलीने केलं आहे. २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर भारत आणि पाकिस्तान हे संघ पहिल्यांदा समोरासमोर येणार आहेत.
“सध्या पाकिस्तानची बाजू वरचढ आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ आमच्याविरोधात खेळत असताना नक्कीच दबावाखाली असेल. युएई आमच्यासाठी घरच्या मैदानाप्रमाणे असल्यामुळे परिस्थितीचा फायदा कसा घ्यायचा हे आम्हाला माहिती आहे. प्रत्यक्ष सामन्यादरम्यान दोन्ही संघातले खेळाडू हे दबावाखाली असतील. मात्र खेळपट्टीचा कसा फायदा उचलायचा हे आम्हाला बरोबर माहिती आहे.” हसन अलीने भारतीय संघाला डिवचलं.
याचसोबत विराट कोहलीला बीसीसीआयने आशिया चषकासाठी विश्रांती दिलेली आहे. भारतीय संघात विराटची अनुपस्थिती असणं ही इतर संघांसाठी सकारात्मक बाब असल्याचंही हसन अली म्हणाला. बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्ताझानेही आपला संघ भारताला पराभूत करु शकेल असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आशिया चषकात कोणता संघ अंतिम फेरीत बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
First Published on September 7, 2018 10:47 am