Asian Games 2018 : इंडोनेशियामध्ये सुरु असलेल्या एशियाड स्पर्धांचा आज सांगता समारंभ झाला. या खेळांमध्ये भारताने १४व्या दिवशी २ सुवर्ण पदके कमावत भारतीय चाहत्यांना गोड आठवणी दिल्या. बॉक्सर अमित पांघलने ४९ किलो वजनी गटात, तर प्रणब बर्धन-शिबनाथ सरकार या जोडीने ब्रिज क्रीडा प्रकारच्या पुरुष दुहेरी गटात सुवर्णपदक जिंकले. याशिवाय भारताने दिवसभरात स्क्वॉशमध्ये एका रौप्यपदकाची कमाई केली. तर भारतीय पुरुष हॉकी संघाने भारताला कांस्यपदक जिंकवून दिले आणि भारताची पदकसंख्या ६९वर नेली. एशियाड स्पर्धांच्या इतिहासात भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. या बाबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सर्व खेळाडूंचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
भारताने आशियाई स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली. आपल्या क्रीडापटूंनी विक्रमी पदके कमावत इतिहास रचला. ही उज्ज्वल भविष्याची नांदी आहे. प्रत्येक खेळाडू, पदक विजेते आणि या स्पर्धांना यशस्वी करणाऱ्या प्रत्येकाचे मी अभिनंदन करतो, असे त्याने ट्विट केले आहे.
We’ve been brilliant across sports & our athletes’ record-breaking performances are a sign of things to come. Congratulating every Indian athlete, medalist & the entire support system that made #AsianGames2018 such a huge success for India. 69 medals #SportPLAYINGIndia pic.twitter.com/7pEBBEEBa6
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 2, 2018
भारताने यंदाच्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक ६९ पदके मिळवली. या आधी गुआंगझू येथे झालेल्या २०१० सालच्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताला ६५ पदके मिळवण्यात यश आले होते. तर १९८२ साली नवी दिल्लीत झालेल्या स्पर्धांमध्ये भारताने ५७ पदकांची कमाई केली होती. तीच कामगिरी करण्यात भारताला २०१४च्या इंचियॉन आशियाई स्पर्धांमध्ये यश आले होते. याशिवाय, २००६ साली झालेल्या दोहा स्पर्धेत (५३), १९६२ सालच्या जकार्ता स्पर्धांमध्ये (५२) आणि १९५१ सालच्या नवी दिल्लीतील स्पर्धांमध्ये (५१) भारताला पदकांची अर्धशतक गाठता आले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 2, 2018 8:24 pm