आगामी आशियाई खेळांसाठी भारतीय हॉकी संघाच्या वेळापत्रकाची आज घोषणा करण्यात आलेली आहे. भारताचा समावेश अ गटात करण्यात आला असून तुलनेने भारतासमोर सोपं आव्हान असणार आहे. मात्र भारतीय संघाचे प्रशिक्षक हरेंद्रसिंह यांनी संघाला सावधानतेचा इशारा दिला आहे.

“भारतीय संघाने मागच्या आशियाई स्पर्धांचं विजेतेपद मिळवलं होतं. मात्र असं असलं तरीही प्रतिस्पर्धी संघांना आम्ही हलकं लेखणार नाहीयोत. माझ्या दृष्टीने भारतासाठी हा सोपा गट अजिबात नाहीये. श्रीलंका, हाँगकाँग चीन यांच्यासारख्या संघांविरोधात आम्हाला अधिक सजग रहावं लागणार आहे. या संघांविरोधात भारतीय संघ कधीही हॉकी खेळला नाहीये, त्यामुळे प्रत्यक्ष स्पर्धेदरम्यान हे संघ कसा खेळ करतील याची आम्हाला कल्पना नसणार आहे.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत हरेंद्रसिंह बोलत होते.

अवश्य वाचा – आशियाई खेळ २०१८ – भारतीय हॉकी संघाचं वेळापत्रक जाहीर

जपानचा संघ केल्या काही वर्षांमध्ये चांगला खेळ करतो आहे. २०१४ साली झालेल्या आशियाई खेळांच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानचा पराभव करुन ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं होतं. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेतही भारतीय संघाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.