सामन्यात दोन वेळा आघाडी घेऊनही भारताला कनिष्ठ महिलांच्या आशियाई हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानकडून ४-५ असा पराभव स्वीकारावा लागला.
उत्कंठापूर्ण झालेल्या या लढतीत पूर्ण वेळेनंतर २-२ अशी बरोबरी झाली होती. चौथ्या मिनिटाला दीपग्रेस एक्काने भारतास आघाडी मिळवून दिली. मात्र १८व्या मिनिटाला जपानची कर्णधार युकारी मानोने गोल केला व १-१ अशी बरोबरी साधली. २५व्या मिनिटाला भारतास गोल करण्याची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत रेणुका यादवने गोल करीत संघास आघाडी मिळवून दिली. भारताने बराच वेळ ही आघाडी राखली होती. मात्र ५८व्या मिनिटाला जपानच्या अयाना हिराहाराने सुरेख गोल करीत सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली.
पूर्ण वेळेत हीच बरोबरी कायम राहिल्यामुळे पेनल्टी शूटआऊटचा उपयोग करण्यात आला. मात्र, त्यात भारतीय खेळाडूंना अपयश आले. त्यामध्ये भारताकडून नवज्योत कौर व प्रीती दुबे या दोनच खेळाडू गोल करू शकल्या. जपानच्या तीन खेळाडूंनी गोल करीत संघाला विजय मिळवून दिला.