पावसाने व्यत्यय आणलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ९ गडी राखून मात केली. वन-डे मालिका खिशात टाकल्यानंतर भारताने टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. डकवर्थ लुईस नियमानूसार भारताला ६ षटकांमध्ये ४८ धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं, जे रोहित शर्माच्या विकेटच्या मोबदल्यात भारताने सहज पार केलं.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने कालच्या सामन्यात पुन्हा निराशा केली. कर्णधार डेव्हीड वॉर्नर लवकर माघारी परतला, यानंतर फिंच आणि मॅक्सवेलने कांगारुंचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र भारतीय गोलंदाजांनी त्यांनाही तंबूत धाडलं. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलने या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत मोठी धावसंख्या उभारण्याची संधीच दिली नाही. १८.४ षटकांत ११८ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर सामन्यात पावसाचा व्यत्यय आला, यानंतर डकवर्थ लुईस नियमांनूसार भारताला सुधारीत धावसंख्येचं आव्हान देण्यात आलं.

या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून तब्बल ९ विक्रमांची नोंद करण्यात आली.

६ – कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे तब्बल ६ फलंदाज त्रिफळाचीत झाले. यासोबत भारताने टी-२० सामन्यात सर्वाधीक फलंदाजांना त्रिफळाचीत करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.

१ – भारताचा अपवाद वगळता एखाद्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधीत टी-२० सामने जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावे आहे. झिम्बाब्वेविरुद्ध पाकिस्तानने सलग ९ टी-२० सामने जिंकले आहेत.

२ – ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० संघाचं कर्णधारपद भुषविणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला.

३ – एखाद्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सलग ७ टी-२० सामने जिंकणारा भारत हा तिसरा देश ठरला. या यादीत भारताच्या पुढे पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन संघ आहेत. दोघांनीही बांगलादेशला सर्वाधीक वेळा हरवलं आहे.

४ – या दौऱ्यात युझवेंद्र चहलने ग्लेन मॅक्सवेलला सलग चौथ्यांदा बाद केलं.

५ – एका टी-२० सामन्यात सहा फलंदाज त्रिफळाचीत होण्याची ही पाचवी वेळ ठरली.

७ – भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग ७ टी-२० सामने जिंकले आहेत.

८ – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला गेलेला हा १४ वा टी-२० सामना ठरला, आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने तब्बल ७ वेळा कर्णधार बदलले, कालच्या सामन्याचं प्रतिनिधीत्व केलेला डेव्हीड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा आठवा कर्णधार ठरला.

५० – टी-२० क्रिकेटमधला हा ५० वा विजय ठरला. हा विक्रम करणारा भारत चौथा देश ठरला आहे. याआधी पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघानी हा विक्रम साधला आहे.