श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत २-० असा विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचं विमान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात जमिनीवर आलं आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचत, भारतावर १० गडी राखून मात केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. वॉर्नरने या सामन्यात नाबाद १२८ तर फिंचने नाबाद ११० धावा केल्या. दोन्ही सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियन डावाची सुरुवात आक्रमक केली. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. अर्धशतकी भागीदारीचं दोन्ही फलंदाजांनी शतकी भागीदारीत रुपांतर केलं. भारताचा एकही गोलंदाज ऑस्ट्रेलियन सलामीवीरांना माघारी धाडू शकला नाही. त्याआधी, नवीन वर्षात ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघासोबत पहिला वन-डे सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने २५५ धावांपर्यंत मजल मारली.ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारतीय धावगतीवर अंकुश लावला. भारताकडून सलामीवीर शिखर धवनने ७४ तर लोकेश राहुलने ४७ धावांची खेळी करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या १० धावा काढून माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुलने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान शिखर धवनने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. लोकेश राहुल अर्धशतकापासून अवघ्या ३ धावा दूर असताना बाद झाला आणि भारताची जोडी फुटली. यानंतर भारतीय फलंदाजांनी निराशाजनक खेळी केली. शिखर धवन ७४ धावांची खेळी करुन माघारी परतल्यानंतर एकही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही. सर्व फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिल्यामुळे मोक्याच्या षटकांमध्ये भारत धावसंख्या वाढवू शकला नाही. तळातल्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने २५५ धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ३, पॅट कमिन्स आणि रिचर्डसनने २ तर झॅम्पा-आगरने १-१ बळी घेतला.