अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या बळावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं ३०० धावांचा टप्पा पार केला. विराट कोहली बाद झाल्यानतर संकटात सापडलेल्या भारतीय संघाला जाडेजा-पांड्या या जोडगोळीनं बाहेर काढलं. जाडेजा आणि पांड्या यांनी सहाव्या गड्यासाठी नाबाद १५० धावांची भागिदारी करत संघाला सन्माजनक धावसंख्या उभारुन दिली. सहाव्या गड्यासाठी भारताकडून ही तिसरी सर्वोत्तम भागिदारी आहे. पहिल्या क्रमांकावर रायडू आणि बिन्नी यांची भागिदारी आहे. रायडू-बिन्नी यांनी सहाव्या गड्यासाठी १६० धावांची भागिदारी केली होती. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर युवराज आणि धोनी यांचा क्रमांक लागतो. युवराज-धोनी यांनी सहाव्या गड्यासाठी १५८ धावांची भागिदारी केली होती. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांनी नाबाद १५० धावांची भागिदारी केली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्यानं तुफानी फलंदाजी करत ७६ चेंडूत ९२ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीदरम्यान पांड्यानं ७ चौकार आणि एक षटकार लगावला. जाडेजानं ५० चेंडूत ६६ धावांची खेळी करत हार्दिकला चांगली साथ दिली. जाडेजानं ३ षटकार आणि ५ चौकाराच्या मदतीनं ६६ धावांची खेळी केली. मयांक अग्रवालच्या अनुपस्थितीत युवा शुबमन गिल शिखर धवनच्या सोबतीला सलामीसाठी आला. आश्वासक सुरुवात केल्यानंतर शिखर धवन शेन अबॉटच्या गोलंदाजीवर सोपा झेल देऊन माघारी परतला. यानंतर कर्णधार विराटने शुबमन गिलच्या साथीने महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. गिलने यादरम्यान काही सुरेख फटके खेळले. फिरकीपटू अॅगरने गिलला माघारी धाडत भारताला मोठा धक्का दिला. यानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलही फारशी चमक न दाखवता माघारी परतले. विराट आणि पांड्याने संयमी खेळ करत भारताची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. अखेरच्या षटकांमध्ये कांगारुंची धुलाई करत पांड्या-जाडेजा जोडीने भारताला दमदार पुनरागमन करुन दिलं. पांड्याने नाबाद ९२ तर जाडेजाने नाबाद ६६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अॅगरने २ तर हेजलवूड-झॅम्पा आणि अबॉटने प्रत्येकी १-१ बळी घेतला.