भारत आणि ऑस्ट्रेलियाचे सामने कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. परंतु यावेळी या सामन्यांची चर्चा होण्याचं कारण वेगळंच आहे. यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमुळे नाही तर दुसऱ्याच कारणामुळे हा दौरा चर्चेचा विषय ठरत आहे. ऑस्ट्रेलियातील वाहिनी चॅनल ७ नं क्रिकेट ऑस्ट्रेलियाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. तसंच ऑस्ट्रेलियाचे क्रिकेड बोर्ड हे बीसीसीआयला घाबरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’च्या वृत्तानुसार चॅनल ७ नं न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. बीसीसीआयच्या सोयीनुसार मालिकेच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला असून हे प्रसारणाच्या कराराचं उल्लंघन असल्याचं चॅनलनं न्यायालयात म्हटलं आहे. “ऑस्ट्रेलियाला भारताविरोधात एकदिवसीय आणि टी २० सामन्यांऐवजी दिवस रात्र कसोटी सामन्यासह कसोटी मालिकेचं आयोजन करायचं होतं. परंतु आता ते सामने १७ डिसेंबरपासून खेळवले जाणार आहेत. हे अतिशय दुर्देवी आणि ऑस्ट्रेलियातील मालिकेचे प्रसारक म्हणून आमच्या सन्मान केला जात नाही. ऑस्ट्रेलियाचं क्रिकेट बोर्ड बीसीसीआयला घाबरतं,” असा आरोप सेव्हन वेस्ट मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स वॉरबर्टन यांनी केला.

बीसीसीआय आणि अन्य प्रसारणाचे करार असलेली फॉक्सटेल यांच्या मर्जीनुसार सर्वकाही सुरू आहे. या दौऱ्याच्या कार्यक्रमाला अंतिम रूप देताना सीए, बीसीसीआय, फॉक्सटेल आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये ईमेल द्वारे झालेलं संभाषण आपल्याला पाहायचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, विराट कोहलीच्या उनुपस्थिमुळेही चॅनल ७ ला मोठं नुकसान सोसाव लागल्याचं म्हटलं जात आहे. चॅनल ७ ला चार कसोटी सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क आहेत. तर फॉक्स स्पोर्ट्सला एकदिवसीय आणि टी-२० मालिकांचे हक्क देण्यात आले आहेत. दरम्यान, या दोन्ही मालिकांमध्ये विराट कोहली खेळणार आहे. परंतु कसोटी सामन्यामधील एकच सामन्यामध्ये विराट खेळणार आहे. दरम्यान दोन्ही चॅनलनं विराटवरच आपले प्रोमो तयार केले होते. परंतु विराटच्या पॅटरनिटी लिव्हमुळे चॅनल ७ ला नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.