बहरीन इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत पाचही जेतेपदांवर भारतीय खेळाडूंनी आपले नाव कोरले. पुरुषांमध्ये समीर वर्माने श्रीलंकेच्या दिनुका करुणारत्नेवर २१-११, १८-२१, २१-१६ अशी मात केली. महिलांमध्ये सायली राणेने सन्ताश सनिरूला १४-२१, २१-१९, २१-१७ असे नमवले. महिला दुहेरीत प्राजक्ता सावंत आणि अराथी सारा सुनील जोडीने भारताच्याच अपर्णा बालन आणि संयोगिता घोरपडे जोडीवर १८-२१, २१-१८, २१-१६ अशी मात केली. पुरुष दुहेरीत नंदगोपाल आणि व्ही. दिजूने भारताच्याच अनुभवी रूपेश कुमार आणि सनावे थॉमस जोडीवर २१-१७, १२-२१, २१-१९ असा विजय मिळवला. मिश्र दुहेरीत अरुण विष्णू आणि अपर्णा बालन जोडीने व्ही. दिजू आणि एन. सिक्की रेड्डीचा २१-१४, २५-२३ असा पराभव केला.