भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने पुन्हा एकदा आपलं सामाजिक भान दाखवून दिलं आहे. जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत बजरंगने मिळवलेलं रौप्यपदक, अमृतसर रेल्वे अपघातातील मृतांना समर्पित केलं आहे. हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात झालेल्या स्पर्धेत जपानच्या मल्लाने अंतिम फेरीत बजरंगवर मात केली. १६-९ च्या फरकाने सामना जिंकत जपानच्या खेळाडूने सुवर्णपदक मिळवलं.

या स्पर्धेनंतर बजरंगने आपल्या ट्विटर हँडलवरुन हे पदक आपण अमृतसर रेल्वे अपघातातील मृत व्यक्तींना समर्पित करत असल्याचं सांगितलं.

शुक्रवारी अमृतसरच्या चौडा बाजार परिसरात रावण दहनाच्या वेळी झालेल्या अपघातात, ६१ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.