आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारण्याची किमया करणाऱ्या बांगलादेश संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अभियानाची विजयी सुरुवात केली. धरमशाला येथील निसर्गरम्य स्टेडियमवर बांगलादेशने नेदरलँड्सवर आठ धावांनी निसटता विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २० षटकांमध्ये ७ बाद १५३ धावा केल्या. त्याचे श्रेय सलामीवीर तमीम इक्बालने केलेल्या नाबाद ८३ धावांना द्यावे लागेल. तोच सामनावीर ठरला. नेदरलँड्सकडून तिम व्हॅनडर गुगतेन याने सर्वाधिक तीन बळी घेतले. नेदरलँड्सने विजयासाठी असलेले १५४ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले मात्र मोठय़ा भागीदारीच्या अभावी त्यांना निर्धारित षटकांत ७ बाद १४५ धावांपर्यंतच पोहोचता आले.