नोव्हेंबर महिन्यात खेळवल्या जाणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरियाणाचा अष्टपैलू खेळाडू हिमांशु राणाकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं असून, अभिषेक शर्मा संघाचा उप-कर्णधार म्हणून काम पाहणार आहे. मात्र या संघात गेल्या काही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मुंबईच्या पृथ्वी शॉला वगळल्याने सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मागच्या वर्षी आशिया चषक जिंकला होता. अंतिम सामन्यात श्रीलंकेला हरवून सलग तिसरं विजेतेपद भारताने आपल्या नावे केलं होतं. २०१२ साली या स्पर्धेला सुरुवात झाली होती, पहिल्या वर्षी भारत-पाकिस्तान यांना संयुक्त विजेता म्हणून घोषीत करण्यात आलं होतं. यंदाचा आशिया चषक ९ ते २० नोव्हेंबरदरम्यान मलेशिया येथे खेळवला जाणार आहे. पृथ्वीने आशिया चषकाऐवजी रणजी स्पर्धेत खेळणं गरजेचं असल्याचं निवड समितीच्या सदस्यांचं म्हणणं आहे.

असा आहे आशिया चषकासाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ –

हिमांशु राणा (कर्णधार), अभिषेक वर्मा (उप-कर्णधार), अथर्व तायडे, मनोज कालरा, सलमान खान, अनुज रावत, हार्विक देसाई, रियान पराग, अनुकुल रॉय, शिव सिंह, तनुश कोटीयन, दर्शन नलकंदे, विवेकानंद तिवारी, आदित्य ठाकरे आणि मनदीप सिंह.