काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात भारताचे ४० हून अधिक जवान शहीद झाले. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध प्रचंड रोष भारतातून आणि जगभरातून व्यक्त होण्यास सुरुवात झाली. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर द्यावे, असा सूर भारतीयांमधून दिसू लागला आहे. या दरम्यान पाकिस्तान लीग खेळायचे असल्यास परदेशी खेळाडूंनी IPL वर पाणी सोडावे हा प्रस्ताव BCCI च्या प्रशासकीय समितीकडून CoA फेटाळण्यात आला आहे.

World Cup 2019 मध्ये १६ जूनला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्यातही भारताने पाकिस्तानशी सामना खेळू नये, असा सूर सर्वत्र उमटत आहे. या दरम्यान पाकिस्तान सुपर लीग टी २० स्पर्धा खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंना IPL मध्ये प्रवेश देऊ नये, असा एक प्रस्ताव BCCI मध्ये ठेवण्यात आला होता. मात्र BCCI च्या प्रशासकीय समितीच्या CoA बैठकीत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

CoA चे प्रमुख विनोद राय, महिला सदस्या डायना एडलजी आणि नवनिर्वाचित सदस्य रवी थोडगे यांच्या बैठकीत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. परदेशी खेळाडू हे पाकिस्तान सुपर लीग खेळत असले, तरी IPL मध्ये त्यांना BCCI ने नव्हे, तर संघमालकांनी विकत घेतले आहे. त्यामुळे अशा प्रकारचा प्रस्ताव स्वीकारता येऊ शकत नाही, असा निष्कर्ष या बैठकीत काढण्यात आला. सध्या एबी डिव्हिलियर्स, ड्वेन ब्राव्हो, सुनील नारायण, कार्लोस ब्रेथवेट, कॉलिन इनग्राम आणि आंद्रे रसल हे महत्वाचे खेळाडू पाकिस्तान सुपर लीग मध्ये खेळात आहेत.