विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात मितालीला संघातून वगळल्याचे प्रकरण

महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताची सर्वात अनुभवी फलंदाज मिताली राज हिला वगळल्याबद्दल टीकेची झोड उठत असतानाच, सोमवारी कर्णधार हरमनप्रीत, मिताली यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आणि महाव्यवस्थापक साबा करीम यांची वैयक्तिकपणे भेट घेऊन आपले म्हणणे मांडले.

मिताली, हरानप्रीतसह भारतीय संघाची व्यवस्थापिका तृप्ती भट्टाचार्य यांनीही त्यांची भेट घेतली आणि संघनिवडीबद्दल आपले मत मांडले. ‘‘मी आणि साबा करीम यांनी मिताली, हरमनप्रीत आणि तृप्ती भट्टाचार्य यांच्याशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकले. त्यांनी मांडलेले मुद्दे आम्ही लिहून ठेवले आहेत,’’ असे जोहरी यांनी सांगितले. मात्र या चर्चेदरम्यान काय घडले, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

जोहरी आणि करीम हे याबाबतचा अहवाल लवकरच बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीकडे सादर करणार आहेत. त्याच्या आधारावर किंवा गरज पडल्यास, या सर्वाशी पुन्हा एकदा चर्चा करून या प्रकरणाविषयी अंतिम निर्णय दिला जाणार आहे. महिला संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार हे बुधवारी जोहरी आणि करीम यांची भेट घेणार असल्याचे समजते.

पोवारला मुदतवाढ नाही!

रमेश पोवारचा अंतरिम प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत असून त्याला मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. ‘‘अनिल कुंबळेसारख्या दर्जेदार क्रिकेटपटूलाही प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करावा लागला होता. त्यामुळे पोवार त्यासाठी अपवाद अस शकत नाही. त्यामुळे पोवारला पुन्हा एकदा अर्ज सादर करून नव्याने मुलाखतीला सामोरे जावे लागेल,’’ असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

संघनिवडीवरील प्रश्नचिन्ह अयोग्य -एडलजी

भारतीय महिलांचा संघ ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाल्यामुळे व्यवस्थापनाने केलेल्या संघाच्या अंतिम अकरा खेळाडूंच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे अयोग्य असल्याचे मत भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार आणि प्रशासकीय समिती सदस्य डायना एडलजी यांनी व्यक्त केले.