भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस बीसीसीआयने केली आहे. प्रत्येक वर्षी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआय चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावं पाठवत असते. २०१९ विश्वचषकात ५ शतकांसह केलेली धडाकेबाज कामगिरी आणि याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये केलेलं दमदार पुनरागमन यामुळे बीसीसीआयने खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

याव्यतिरीक्त अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा यांची नावं बीसीसीआयने सुचवली आहे. काही दिवसांपूर्वी जसप्रीत बुमराहचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी शर्यतीत होतं. मात्र अखेरीस सिनीअर खेळाडूंसोबतच्या शर्यतीत त्याचं नाव मागे पडलंय. २०१८ सालीही शिखरचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं होतं. मात्र अंतिम यादीत त्याची निवड झालेली नव्हती. त्यामुळे यंदाच्या वर्षात कोणत्या खेळाडूची मानाच्या पुरस्कारासाठी निवड होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.