युवराज सिंह हा भारतीय क्रिकेट संघाच्या मधल्या फळीतला महत्वाचा फलंदाज. मात्र, गेले काही खराब कामगिरी आणि दुखापतीमुळे या खेळाडूला भारतीय संघात जागा मिळाली नाहीये. ऑस्ट्रेलिया पाठोपाठ न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठीही युवराज सिंहची संघात निवड झालेली नाहीये. मात्र, सध्या भारताचा हा फलंदाज संघात पुनरागमन करण्यासोबत आपलं थकीत मानधन परत मिळवण्यासाठीही बीसीसीआयशी लढतोय. युवराज सिंहची आई शबनम यांनीही बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी आपल्या मुलाच्या थकीत मानधनाबद्दल संपर्क साधला आहे. मात्र, अद्यापही युवराजला आपलं मानधन मिळालेलं नाहीये.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार २०१६ ट्वेन्टी-२० पासून युवराजला त्याचं सामन्याचं मानधन मिळालेलं नाहीये. ही रक्कम सुमारे ३ कोटींच्या घरात असल्याचं समजतंय. २०१७ च्या जुलै महिन्यापासून युवराज दुखापतीमुळे भारतीय संघाचा भाग नाहीये. भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर संघातील प्रत्येक खेळाडुसाठी बीसीसीआयवने यो-यो फिटनेस चाचणी अनिवार्य केली आहे. युवराज सिंह या चाचणीत उत्तीर्ण होऊ शकला नाहीये. २०१६ च्या टी-२० विश्वचषकादरम्यान युवराजला दुखापत झाली होती. यानंतर २०१७ च्या आयपीएल हंगामातले पहिले काही सामनेही युवराज खेळू शकला नव्हता.

काय सांगतो बीसीसीआयचा नियम?
राष्ट्रीय संघाकडून खेळताना कोणत्याही खेळाडूला दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली, तर त्या खेळाडूला मिळणाऱ्या मानधनाची भरपाई बीसीसीआय करतं. यासंदर्भात युवराजने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी अनेकदा संपर्क साधला. मात्र, त्याला अजून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचं कळतंय.

‘डेक्कन क्रोनिकल’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार आशिष नेहराला त्याच्या दुखापतीमुळे मुकाव्या लागणाऱ्या सामन्यांचं मानधन बीसीसीआयकडून मिळालं आहे. मात्र, युवराज अजुनही आपल्या मानधनाच्या प्रतिक्षेत आहे. यानंतर युवराज सिंह आपल्या थकीत मानधनासाठी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर स्थापन केलेल्या प्रशासकीय समितीची भेट घेणार असल्याचं कळतंय. त्यामुळे प्रशासकीय समितीच्या दरबारी युवराज सिंहला न्याय मिळतो का, हे पहावं लागणार आहे.