करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी सध्या जगभरातील क्रिकेट स्पर्धा बंद आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र, स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस स्पर्धेचं आयोजन करता येतं का याची चाचपणी बीसीसीआय करत आहे. केंद्र सरकारकडून स्पर्धा सुरु करण्यासाठी अद्याप हिरवा कंदिल मिळाला नसल्यामुळे बीसीसीआयने अद्याप आयपीएलबद्दल कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. मात्र, timesnow.com ने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने तेराव्या हंगामाचं आयोजन भारताबाहेर करण्याच्या पर्यायावर विचार करायला सुरुवात केली आहे.

“भारतामध्ये स्पर्धा खेळवणं सर्व खेळाडूंसाठी योग्य ठरणार असेल तर आमची पहिली पसंती ही भारतालाच असेल. पण भारताता स्पर्धा खेळवण्याची परवानगी मिळाली नाही आणि आमच्यासमोर कोणताही पर्याय उपलब्ध नसेल तर यंदाची स्पर्धा भारताबाहेर आयोजित करण्याचा पर्याय खुला आहे.” बीसीसीआयने खजिनदार अरुण धुमाळ यांनी times now.com शी बोलताना माहिती दिली. याआधीही २००९ साली आयपीएल दक्षिण आफ्रिकेत तर २०१४ साली काही सामने दुबईत खेळवण्यात आले होते.

याआधीही आम्ही परदेशात आयपीएलचं आयोजन केलं आहे. असं असलं तरीही आमची पहिली पसंती ही भारतात स्पर्धा आयोजित करण्यालाच असेल, पण काहीच पर्याय शिल्लक नसतील तर आम्हाला परदेशात आयोजनाबद्दल विचार करावाच लागेल असं धुमाळ यांनी स्पष्ट केलं. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, या स्पर्धेचं आयोजन पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे. १० जूनला होणाऱ्या बैठकीत आयसीसी याबद्दल निर्णय घेणार असल्याचं कळतंय. त्यामुळे आगामी काळात बीसीसीआय आयपीएलच्या तेराव्या हंगामाबद्दल नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.