१५ सप्टेंबरपासून युएईत होणाऱ्या आशिया चषकासाठी बीसीसीआय शनिवारी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या वानखेडे मैदानातील बीसीसीआयच्या मुख्यालयात बैठक पार पडली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा अ गटात समावेश करण्यात आलेला असून भारतासमावेत पाकिस्तानही या गटात असणार आहे. उर्वरित संघ पात्रता फेरीतून दाखल होईल. ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा समावेश करण्यात आला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंह धोनी यष्टीरक्षक म्हणून संघात आपली जागा कायम राखेल. तर यंदा दिनेश कार्तिक ऐवजी ऋषभ पंतला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून संघात जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याव्यतिरीक्त गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार हा फिट असल्यामुळे त्याची संघातली निवड पक्की मानली जात आहे. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव जोडीवर असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. भारतीय संघ आशियाई चषकाचा गतविजेता आहे, त्यामुळे यंदा आपलं विजेतेपद भारत कायम राखेल का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.