२०१६ सालच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या ३२ जणांना विशेष मानधन देण्यावरुन बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपल्याची बाब समोर आली आहे . बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी २८ फेब्रुवारीला एका ईमेलद्वारे विश्वचषकातील कामगिरीचा मोबदला ३२ कर्मचाऱ्यांना म्हणून विशेष बक्षिस देण्याचा प्रस्ताव मांडला होता. बक्षिसाची ही रक्कम ३.३ कोटी इतकी होती. मात्र, या प्रस्तावावर बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अनिरुद्ध चौधरी यांनी संपूर्ण प्रस्तावाला मान्यता कशी काय देण्यात आली ?. तसेच यामध्ये फेरफार असल्याचे सांगत ताशेरे ओढले आहेत.

राहुल जोहरी यांनी या तब्बल तीन कोटींच्या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठीचा मेल बीसीसीआयचे मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) संतोष रांगणेकर व सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीचे (सीओए) सदस्य विक्रम लिमये आणि बीसीसीआयचे वकील आदर्श सक्सेना यांना पाठवला होता. या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने मान्यता दिली असून आर. पी. शहा आणि एम.व्ही. श्रीधर या दोन संचालकांनी हा प्रस्ताव प्रमाणित केल्याचेही जोहरी यांनी ईमेलमध्ये म्हटले होते. विशेष म्हणजे ज्या ३२ जणांना हे विशेष आर्थिक बक्षिस देण्यात येणार आहे त्यामध्ये आर.पी. शहा आणि एम.व्ही. श्रीधर यांचाही समावेश आहे. या दोघांनाही प्रत्येकी ५५ हजार डॉलर्स मिळणार आहेत. त्यामुळेच अनिरुद्ध चौधरी यांनी या प्रस्तावाबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. हा प्रस्ताव प्रमाणित करणाऱ्या शहा आणि श्रीधर यांनाच ५५ हजार डॉलर्स मिळत असल्याचे दिसत आहे. त्यांनी नक्की काय प्रमाणित केले, याबद्दल मला शंका आहे. ही विशेष रक्कम संबंधित लोकांना दिली जावी, यालादेखील त्यांनीच मान्यता दिली आहे का, असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला आहे.

बीसीसीआयकडून आर्थिक बक्षिस देण्यात येणाऱ्या ३२ जणांमध्ये दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांचा समावेश आहे. त्यांनी बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या सल्लागाराची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे त्यांना बीसीसीआयकडून ३० हजार डॉलर्स देण्यात येणार आहेत. तर, रत्नाकर शेट्टी यांना २० हजार डॉलर्स मिळणार आहेत. याशिवाय, संबंधित लोकांच्या कार्यालयांतील शिपायांना पाच हजार डॉलर्स आणि अनेक कर्मचाऱ्यांवर तीन हजार डॉलर्सची खैरात करण्यात येणार आहे. मात्र, चौधरी यांच्या म्हणण्यानुसार या प्रस्तावात अनेक त्रुटी असून भविष्यात ते सिद्ध झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा ३२ लोकांमुळेच यशस्वी झाली होती का, असा सवालही चौधरी यांनी उपस्थित केला आहे.