शांतता आणि सुरक्षेशिवाय भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट अशक्य आहे, असे खडे बोल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाकिस्तान क्रिकेट बोर्डला(पीसीबी) सुनावले आहे. सोमवारी पंजाबच्या काही भागांमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला. यामध्ये दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे म्हटले जात असून काहींच्या मते या हल्ल्याची अप्रत्यक्षपणे सुई पाकिस्तानकडे जात आहे.
‘‘जर सुरक्षा आणि शांतता नसेल तर त्याचा खेळावर परिणाम होईल आणि त्यामुळेच अशा परिस्थितीत क्रिकेट खेळले जाऊ शकत नाही. मला माहिती आहे की खेळ ही एक वेगळी गोष्ट आहे, पण आमच्यासाठी त्यापेक्षाही देशासाठी सुरक्षा महत्त्वाची आहे,’’ असे मत बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) भविष्यातील कार्यक्रमानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दोन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्याचे निश्चित झाले आहे. हे सामने त्रयस्थ ठिकाणी होणार असून यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा पर्याय सुचवला जात आहे. पण सोमवारी पंजाबमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर बीसीसीआय पाकिस्तानबरोबर खेळण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायला बीसीसीआयचा विरोध नाही, हे सामने शांततेमध्ये व्हायला हवेत.
‘‘दोन्ही मंडळांमध्ये काही गोष्टींवर अजूनही चर्चा व्हायची आहे. या साऱ्या गोष्टींवर सामन्यांपूर्वी चर्चा करून निर्णय घेणे गरजेचे आहे. पण देशाची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे,’’ असे ठाकूर यांनी सांगितले.

भारत-दक्षिण आफ्रिका मालिका २ ऑक्टोबरपासून
spt677

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑक्टोबर महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येत असून २ ऑक्टोबरला ट्वेन्टी-२० सामन्याने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. यानंतर पाच एकदिवसीय आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार असून तीन महिने हा दौरा चालणार आहे.
या दौऱ्यातील बंगळुरुतील दुसरा कसोटी सामना हा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ए बी डी’व्हिलियर्सचा शंभरावा सामना असणार आहे. २००० सालापासून दक्षिण आफ्रिकेने भारताला त्यांच्या मातीत पराभूत केलेले नाही.