भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला प्रसारमाध्यमांशी आणि चाहत्यांशी संवाद साधताना जरा नम्रतेने वाग, अशी ताकीद BCCIच्या प्रशासकीय समितीने (CoA) दिली आहे. विराटने चाहत्याला देश सोडून जाण्याचा सल्ला दिल्यानंतर CoA ने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून अशी ताकीद दिल्याचे समजते आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून २१ नोव्हेंबरपासून यजमानांविरुद्ध टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. त्या आधी समितीने विराटला तंबी दिली असल्याचे समजते.

भारतीय फलंदाजीत विशेष काहीच नाही. त्यांच्यापेक्षा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अधिक चांगले खेळतात, असं एका चाहत्यानं म्हटलं होते. त्यावर विराट कोहलीचा पारा चढला आणि त्याने क्रिकेट चाहत्याला थेट देश सोडून जाण्याचा सल्ला दिला होता. परदेशी खेळाडू आवडत असतील, तर खुशाल देश सोडून जा, असे विराटनं म्हटले होते.

(Video : भारतीय क्रिकेटपटू न आवडणाऱ्या चाहत्याला विराटचा ‘जय महाराष्ट्र’)

त्यावर विराटला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. BCCIच्या प्रशासकीय समितीनेही विराटला धारेवर धरल्याचे समजते आहे. समितीतील सदस्यांनी विराटशी फोनवरून चर्चा केली असे सांगण्यात येत आहे. आक्रमकपणा खेळात असावा, पण प्रसारमाध्यमे आणि लोकांशी संवाद साधताना नम्रतेने वाग, अशी ताकीद देण्यात आले आहे. भारतीय कर्णधारपदाला साजेसे असे वर्तन असायला हवे, असा सल्लाही समितीने दिला. त्यावर विराटनं काय उत्तर दिलं हे समजू शकलेलं नाही. मात्र, समितीनं दिलेला सल्ला विराटनं खूपच मनावर घेतला आहे, असं ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिसून आलं.