अनुभवी सलामीवीर अरिंदम दासने दिमाखदार नाबाद ८० धावांची खेळी साकारून मुंबईकडून फॉलोऑन पत्करल्यानंतर दुसऱ्या डावात बंगालने चांगली लढत दिली आहे. ईडन गार्डन्सवर सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बंगालचा पहिला डाव २१० धावांवर आटोपल्यामुळे मुंबईने फॉलो-ऑन लादला. त्यानंतर दासने रोहन बॅनर्जी (४४) सोबत दमदार सलामीची भागीदारी करून संघाला बिनबाद १२९ धावांपर्यंत मजल मारून दिली.
त्याआधी, बंगालच्या पहिल्या डावात अभिमन्यू इस्वरनने सर्वाधिक ८५ धावा केल्या. त्यांचे तळाचे चार फलंदाज ८० धावांत माघारी परतले. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने पाच बळी घेतले, तर क्षेमल वायंगणकर व विल्किन मोटा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ४१४
बंगाल (पहिला डाव) : सर्व बाद २१० (अभिमन्यू इस्वरन ८५, मनोज तिवारी ६३; शार्दुल ठाकूर ५/५९)
बंगाल (दुसरा डाव) : बिनबाद १२९ (अरिंदम दास खेळत आहे ८०, रोहन बॅनर्जी ४४)