सरावादरम्यान कर्णधार विराट कोहलीच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे, पहिल्या सामन्याआधी भारतीय गोटात चिंतेचं वातावरण पसरलं होतं. मात्र मिळालेल्या माहितीनुसार विराटची दुखापत गंभीर नसून, त्याला पहिल्या सामन्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आलं आहे. सरावादरम्यान दुखापत झाल्यानंतर संघाचे फिजीओ पॅट्रीक फराहत यांनी विराटवर उपचार करत त्याला मैदानाबाहेर नेलं. त्यामुळे ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात विराट कोहली खेळणार आहे.

बीसीसीआयमधील सुत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिल्याचं समजतंय. उपचार घेतल्यानंतर विराटने पुन्हा एकदा नेट्समध्ये येऊन सरावाचं सत्र पूर्ण केल्याचंही कळतंय. त्यामुळे पहिल्या सामन्याआधी भारतीय संघाचा जीव भांड्यात पडला आहे. विराट कोहली गेल्या वर्षभरात चांगल्या फॉर्मात आहे.

अवश्य वाचा – विश्वचषकात पाकिस्तान भारताला हरवूच शकत नाही – सुरेश रैना

विश्वचषकासाठी भारताने समतोल संघाची घोषणा केली आहे. स्पर्धा सुरु होण्याआधी झालेल्या दोन सराव सामन्यांमध्ये भारताला एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात विराट कोहली मैदानात कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – पाकिस्तानला सल्ला देणाऱ्या शोएब अख्तरची केविन पिटरसनने घेतली फिरकी