क्रिकेटच्या मैदानावर अनेक भीमपराक्रम केले जात असताना एका गोष्टीची कायम उत्सुकता वाटत रहाते की इतक्या जवळून या पराक्रमांचा अविष्कार पहाताना पंचं किती विरक्त राहून आपले कर्त्तव्य पार पाडत रहातात. सर्व पंचं कुठल्यातरी स्तरावर क्रिकेट खेळलेले असतात. कुणी प्रथम श्रेणी सामन्यापर्यंत खेळलेला असतो तर कुणी कसोटीवीर सुद्धा असतो. वेंकटराघवन तर भारताचे कर्णधार होते. त्यामुळे अविश्वसनीय खेळ बघून ते निश्चितच रोमांचित होत असणार. पण शिष्टाचारामुळे त्यांना भावनांचे प्रदर्शन करता येत नाही.

एखाद्या खेळाडूने उत्तम शतक केल्यावर त्याला लंच टाइममध्ये वेलप्लेड किंवा पाच विकेट घेणाऱ्याला वेल बोल्ड म्हणणे इथपर्यंतच पंचाची खेळाडूशी सलगी असते. कसोटी संपल्यावर कधीतरी भेटीत विस्तृत चर्चा होउ शकते.  पण प्रत्यक्ष मैदानावर पंचांच्या मधला खेळाडूच्या उत्कट भावनेचे दर्शन कधीही दिसत नाही. अगदी युवराज सिंहने स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूला सहा षटकार मारल्यानंतर सुद्धा स्थित:प्रदज्ञ पंच सायमन टॉफेल यांनी फक्त स्मितहास्य करत सहाव्या षटकाराची खूण केली होती. त्यामुळे जेव्हा स्टीव वॉ च्या शेवटच्या कसोटी नंतर सिडनी मैदानावर पंच बिली बाउडन यांनी स्टीव वॉला आलिंगन देऊन त्याच्या संबंधीच्या आपल्या आदर भावना व्यक्त केल्या तेव्हा सुखद धक्का बसला.  कारण शेवटी खेळ खेळणारी आणि त्याचा न्यायनिवाडा करणारी(पंचं वगैरे)माणसं आहेत रोबो नाहीत.

नागपूर कसोटीत असाच एक सुखद प्रसंग अनुभवायला मिळाला. अश्विनच्या गोलंदाजीवर अफ्रिकेच्या विलासचा लेग साइडला यष्टिरक्षक सहाने अप्रतिम झेल घेतला. जवळजवळ लेग स्लिपच्या दिशेने गेलेल्या चेंडूला सहाने सुंदर स्थितीत येऊन लीलया पकडले. हे बघून स्वत: खेळाडू असताना यष्टिरक्षक असलेले पंच इयन गूल्ड सहा पाशी गेले. त्यांनी सहाने झेल घेताना कसा सुंदर तंत्राचा वापर केला हे सप्रयोग दाखवले आणि सहाला प्रेमाने शाबासकी दिली. हा दुर्मिळ प्रसंग पाहून मस्तं वाटले. शिष्टाचार,नियम कायम राहाणारच. पराक्रमाने संवेदना जागृत होणे आणि त्याचा जाहिर आविष्कार होणे हे कठोर स्पर्धात्मक वातावरणात माणूसकीचे शिंपडलेले गुलाबपाणीच. याचा दरवळ कायम येत राहो आणि आधिच सुंदर असलेला खेळ अजून सुंदर होवो.

– रवि पत्की
sachoten@hotmail.com