गलवान व्हॅलीत भारत आणि चिनी सैन्यामध्ये सुरु असलेल्या तणावाच्या वातावरणामुळे सध्या संपूर्ण देशभरात चीनविरोधी वातावरण आहे. देशातील अनेक भागांत चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. काही भागांमध्ये राजकीय पक्षांनी चिनी मालाची होळीही केली. सध्या बीसीसीआय आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र आयपीएलला VIVO या चिनी कंपनीची मुख्य स्पॉन्सरशीप असल्यामुळे बीसीसीआयला गेल्या काही दिवसात भारतीय चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे देशातील जनभावनेचा आदर करत बीसीसीआयने चिनी कंपनीसोबतच्या करारावर विचार करण्याची तयारी दाखवली आहे. पुढील आठवड्यात आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक पार पडणार आहे, या बैठकीत आयपीएलच्या प्रायोजकत्वाबद्दल विचार करण्यात येईल अशी माहिती IPL च्या अधिकृत ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे. Taking note of the border skirmish that resulted in the martyrdom of our brave jawans, the IPL Governing Council has convened a meeting next week to review IPL’s various sponsorship deals — IndianPremierLeague (@IPL) June 19, 2020 याआधीही बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी संघटनेची बाजू स्पष्ट केली. यंदाच्या हंगामासाठी चिनी कंपनीची स्पॉन्सरशीप कायम राहिलं. मात्र पुढील वर्षासाठी बीसीसीआय याबद्दल नक्की विचार करेल असं धुमाळ यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच सरकारने चिनी माल आणि कंपन्यांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्यास बीसीसीआयही त्याचं अनुकरण करेल असं धुमाळ म्हणाले होते. परंतू सोशल मीडियावर चाहते बीसीसीआयच्या या निर्णयावर समाधानी नसल्याचं चित्र पहायला मिळालं. ज्यानंतर एक पाऊल मागे टाकत बीसीसीायने चिनी कंपनीसोबच्या करारावर विचार करण्याची तयारी दाखवली आहे. २०१८ साली बीसीसीआय आणि VIVO कंपनीत ५ वर्षांचा करार झाला होता, ज्यासाठी VIVO ने २१९९ कोटी रुपये मोजले. प्रत्येक हंगामासाठी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये कंपनीकडून मिळतात. "भविष्यात बीसीसीआयचं कोणतही काम चिनी कंपनीला देणार नाही. चिनी कंपनीला पाठींबा देणं आणि भारतीय स्पर्धेसाठी त्यांची मदत घेणं या गोष्टींमधला फरक आपल्याला समजावून घ्यावा लागेल. कंपनीकडून मिळणाऱ्या पैश्यांवर बीसीसीआय नित्यनियमाने कर भरत आहे. एकाप्रकारे ही भारतीय अर्थव्यवस्थेला मदतच आहे." इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत धुमाळ यांनी बीसीसीआयची बाजू मांडली होती.