सत्याचाच अखेर विजय होतो, हे बॉक्सर मनोज कुमारच्या उदाहरणावरून पुन्हा एकदा सर्वासमोर आले आहे. २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेत्या मनोजला पुरस्कारांपासून डावलण्यात आले होते, त्याविरोधात मनोजने न्यायालयीन लढा देण्याचे ठरवले होते. या लढय़ात मनोजला यश आले आहे.
‘‘मला अर्जुन पुरस्कार प्रदान करणार असल्याचे क्रीडा मंत्रालयाने मला कळवले आहे. २६ नोव्हेंबरला दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये सायंकाळी पाच वाजता हा सोहळा होणार असून क्रीडामंत्री सर्बानंदा सोनवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे,’’ असे मनोज म्हणाला. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने अर्जुन पुरस्कारासाठी मनोजची शिफारस न करता बॉक्सर जय भगवानची शिफारस केली होती. याविरोधात मनोजने क्रीडा मंत्रालयाचे दार ठोठावले होते.