विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला नवीन वर्षात पहिल्या परदेश दौऱ्यात पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने वन-डे आणि कसोटी मालिकेत भारताला व्हाईटवॉश देत, टी-२० मालिकेतील पराभवाचा वचपा काढला. कसोटी मालिकेत भारतीय संघाचा झालेला पराभव हा अपमानजनक होता. न्यूझीलंडच्या जलद माऱ्यासमोर भारतीय फलंदाज पुरते अपयशी ठरले.

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने भारतीय संघाच्या या कामगिरीबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. “गेल्या काही वर्षांत भारतीय संघ सतत प्रवास करतो आहे. माझ्यामते न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिकेतला पराभव हा याच सतत क्रिकेट खेळण्याने झाला आहे. वन-डे आणि टी-२० मालिका खेळल्यानंतर न्यूझीलंडच्या वातावरणात कसोटी खेळणं भारताला अवघड गेलं असावं. पण माझ्या मते अजुनही भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम आहे.” लारा ESPNCricinfo संकेतस्थळाशी बोलत होता.

दरम्यान या पराभवानंतरही कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात भारतीय संघाची कसोटी क्रिकेटमधली कामगिरी कशी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – माझ्यासाठी संघाचा विजय महत्वाचा; न्यूझीलंड दौऱ्यात संधी नाकारलेल्या वृद्धीमान साहाचं मत