जेतेपदांसह विजयपथावर परतलेली भारताची फुलराणी सायना नेहवाल, आशियाई आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने पदकासह उमटवलेली मोहोर, उबेर चषक-राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धातील धवल यश यामुळे भारतीय बॅडमिंटनसाठी हे वर्ष उज्ज्वल पर्व ठरले.
सिंधूची घोडदौड
सायनाच्या कारकीर्दीत चढउतार सुरू असताना पी.व्ही. सिंधूने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूला सुवर्णपदक पटकावण्याची संधी होती, मात्र मोक्याच्या क्षणी चुका झाल्याने तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिन्याभरातच प्रतिष्ठेच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने कांस्यपदक कायम राखले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन पदके पटकावणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू आहे.

श्रीकांत – नवा तारा
यंदाच्या वर्षांत बॅडमिंटन विश्वाला मिळालेला तारा म्हणजे किदम्बी श्रीकांत. वर्षांच्या सुरुवातीला जागतिक k05क्रमवारीत ४५व्या स्थानी असणाऱ्या श्रीकांतने अख्खे वर्ष सातत्यपूर्ण प्रदर्शन करत वर्षअखेरीस क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली. हे यश मिळवणारा श्रीकांत हा प्रकाश पदुकोण आणि पुल्लेला गोपीचंद यांच्यानंतरचा केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे. सार्वकालीन महान खेळाडू लिन डॅनला आश्चर्यकारकरीत्या नमवत श्रीकांतने चीन सुपर सीरिज स्पर्धा जिंकली. क्रमवारीत अव्वल आठ खेळाडूंत रंगणाऱ्या वर्ल्ड सुपर सीरिज फायनल्स या स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला आणि उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.

सायनाचे पुनरागमन आणि गोपीचंदशी फारकत
दुखापती आणि खराब फॉर्म यामुळे सायनाला २०१३ मध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मात्र यंदा दुखापतींच्या योग्य व्यवस्थापन आणि नव्या ऊर्जेसह परतलेल्या सायनाने तीन स्पर्धाची जेतेपदे k02पटकावली. एप्रिल महिन्यात दिल्लीत झालेल्या इंडिया ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावत सायनाने दीड वर्षांचा जेतेपदांचा दुष्काळ संपवला. पुढच्याच महिन्यात दिल्लीत झालेल्या थॉमस आणि उबेर चषक स्पर्धेत सायनाच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने कांस्यपदकाची कमाई करत इतिहास घडवला. हाच फॉर्म कायम राखत जूनमध्ये तिने ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. दोन वर्षांनंतर सायनाला सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावता आले. बॅडमिंटनचे सत्ताकेंद्र असलेल्या चीनमध्ये चीन सुपर सीरिज स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरत सायनाने शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला. मात्र वर्षअखेरीस झालेल्या वर्ल्ड सुपर सीरिज फायनल्स स्पर्धेत मात्र उपांत्यपूर्व फेरीत तिला गाशा गुंडाळावा लागला. दुखापतीमुळे शरीरावर आलेल्या मर्यादांचे भान ठेवत, प्रतिस्पध्र्याच्या खेळाचा सखोल अभ्यास करत सायनाने मिळवलेले यश हे रिओ ऑलिम्पिकच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
पुलेल्ला गोपीचंद आणि सायना म्हणजे क्रीडाविश्वातल्या गुरुशिष्य परंपरेतील नामांकित जोडी. लहान वयातच सायनातील चमक ओळखून तिला घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे  व्यक्तिमत्त्व म्हणजे k03गोपीचंद. मात्र राष्ट्रीय प्रशिक्षकाची जबाबदारी, अकादमीतील खेळाडूंना मार्गदर्शन, निवडसमिती सदस्याचे कामकाज, स्पर्धाच्या निमित्ताने प्रवास यामुळे गोपीचंद आपल्याला मार्गदर्शनासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याचे सायनाच्या लक्षात आले. इतकी वर्षे मोलाची साथ देणाऱ्या गोपीचंद यांच्याऐवजी माजी खेळाडू विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळुरूमध्ये सराव करण्याचा सायनाने निर्णय घेतला. यश आणि जेतेपदांपेक्षाही गुरुशिष्याच्या आदर्श जोडीचे विभक्त होणे बॅडमिंटन विश्वातला सगळ्यात चर्चित विषय ठरला. विभक्त होणे हे भांडणातून नसून परस्पर सामंजस्यातून आहे, असे सायना आणि विमल कुमार यांनी वारंवार स्पष्ट केले. त्याच वेळी नव्या दृष्टिकोनासाठी प्रशिक्षक बदलणे स्वाभाविक कृती असल्याचे गोपीचंद यांनी सांगितले. विमल यांच्या मार्गदर्शनाखाली पटकावलेल्या जेतेपदामुळे तूर्तास तरी नवीन जोडी डाव पुढे खेळत राहण्याची शक्यता
आहे.

पदकांची लयलूट
३२ वर्षांचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवत पारुपल्ली कश्यपने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकावर कब्जा केला. आरएमव्ही गुरुसाईदत्तने कांस्यपदक पटकावले. याच स्पर्धेत ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीने रौप्यपदक पटकावले. या जोडीने एप्रिलमध्ये झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही कांस्यपदकाची कमाई केली होती. इन्चॉन, दक्षिण कोरिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने कांस्यपदकावर नाव कोरत ऐतिहासिक कामगिरी
केली.

नव्या खेळाडूंची फौज तय्यार
सौरभ वर्माने इराण फजीर आणि ऑस्ट्रियन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या आगमनाची नांदी दिली. पी.सी. तुलसीने श्रीलंका आणि बहरीने स्पर्धामध्ये जेतेपदाची कमाई केली. k04सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर असूनही जेतेपदापासून वंचित असणाऱ्या अजय जयरामने डच ग्रां.प्रि. स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. गोपीचंद अकादमीच्या एच.एस. प्रणॉयच्या रूपात भारताला मेहनती आणि गुणवान बॅडमिंटनपटू मिळाला. प्रणॉयने यंदा इंडोनेशिया मास्टर्स ग्रां.प्रि तसेच टाटा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. अनुभवी अरविंद भटने जर्मनी खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरत आपण स्पर्धात्मक बॅडमिंटनसाठी सक्षम असल्याचे सिद्ध केले. लहान वयातच मोठी झेप घेणाऱ्या रुथविका शिवानीने टाटा खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावत सायना, सिंधूनंतरची महिला बॅडमिंटनपटूंमधील पोकळी कमी होईल असा विश्वास दिला
आहे.