रविंद्र जडेजाच्या फिरकीने मंगळवारी वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तंबूत धाडला. त्यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताला वेस्ट इंडिजला २३३ धावांवर रोखण्यात यश आले. जडेजाला भुवनेश्वरकुमार, आर. अश्विन, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनीही साथ दिली. या तिघांनी वेस्ट इंडिजचा प्रत्येकी एक गडी बाद केला. ५० षटकांत वेस्ट इंडिजने नऊ गड्यांच्या मोबदल्यात २३३ धावा केल्या आहेत.
अचूक टप्प्यावरील गोलंदाजीने जडेजाने वेस्ट इंडिजचे पाच मोहोरे टिपले. यामध्ये सलामीवीर जॉन्सन चार्ल्स, मार्लन सॅम्युअल्स, रामनरेश सारवान, सुनील नरिन आणि रवि रामपॉल यांचा समावेश आहे.
भारताने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय गोलंदाजानी सार्थ ठरवला. वेस्ट इंडिजच्या फलंदाजीला भारतीय गोलंदाजांनी एका मागून एक धक्के देणे सुरूच ठेवले. सलामीवीर जॉन्सन चार्ल्स आणि डॅरेन सॅमी वगळता वेस्ट इंडिजचा एकही फलंदाज फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही. या दोघांनी अनुक्रमे ६० आणि ५६ धावा करून धावांचा आकडा वाढवण्यास मदत केली.