कबड्डी, कुस्ती आणि खो-खो या मातीतल्या खेळांनी देशाची वेस ओलांडली. या खेळांचा जगभर प्रसार करण्यासाठी आणि ते ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवण्यासाठी मातीतले हे खेळ मॅटवर आले. पण या खेळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेताना पारंपरिकेची साज आणि खेळाचा आत्मा हरवल्याचा सूर ऐकू येत आहे. मातीतल्या खेळांचे मॅटवर झालेले हे स्थलांतर कितपत योग्य आहे, मॅटमुळे वाढणारा खर्च सर्वाना परवडणार का, मॅटचे फायदे किंवा त्यामुळे होणाऱ्या दुखापती, याबाबत केलेला हा उहापोह-

..तरच काळाच्या ओघात खेळ टिकेल !
गेली दोन दशके मॅट की माती, हेच गुऱ्हाळ चालू आहे. १९९३ साली इंग्लंडच्या बर्मिगहम शहरातील बंदिस्त अरान्हा येथे प्रथम मॅटवर कबड्डीची स्पर्धा पार पडली. तेव्हा ही स्पर्धा खेळून आलेल्या संघांची वार्ताहर परिषद मुंबईतील डॉ. शिरोडकर हॉल येथे झाली. त्यावर मॅट की माती यावर फार गदारोळ झाला. परंतु कबड्डी या खेळाला जर आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यावयाचे असेल, त्याला जगभरात मान्यता मिळवून द्यावयाची असेल, तर मॅटवर कबड्डी खेळल्याशिवाय पर्याय नाही, हे कबड्डीतील जाणकारांना समजून चुकले होते. त्यानुसार या खेळात काही बदल होणे अपेक्षित होते. मॅटबाबतही सर्व अंगांनी सांगोपांग विचार व्हावयास हवा होता. इंग्लंड येथे जी स्पर्धा झाली त्याकरिता वापरण्यात आलेले मॅट हे उच्च दर्जाचे ‘ओवा’ मॅट होते. याचा अभ्यास करणे गरजेचे होते. ते झाले नाही. मॅटवर खेळल्याने काय तोटे होतात, याचा आपण विचार आज करीत आहोत. त्या त्रुटीवर मात करता येईल का? याचाही विचार आपण करणार आहोत.
आज आपण जे मॅट वापरतो ते एक-एक मीटरच्या तुकडय़ाचे बनविलेले असते. हे तुकडे एकत्रित करून क्रीडांगण तयार करण्यात येते. परंतु हे मॅट ज्या क्रीडांगणावर वापण्यात येते ते क्रीडांगण बहुतेक वेळा सम-पातळीत नसते. त्यामुळे खेळताना ते उकलून खेळाडू जायबंदी होण्याची शक्यता अधिक असते. भारतात सामने हे खुल्या मैदानावर मॅट टाकून खेळविण्यात येतात. त्यामुळे त्यावर रात्री व सकाळच्या सत्रात दव पडून मॅट निसरडे होते. नुकत्याच झालेल्या आरसीएफच्या स्पर्धेत दवाच्या त्रासामुळे पुन्हा मातीच्या क्रीडांगणावरच सामने खेळविण्यात आले. मॅटवर सामने खेळताना दमछाक जास्त होते. त्याचबरोबर यावर खेळल्याने पायाच्या सांध्यांना (गुडघ्यांना) याचा जास्त त्रास जाणवतो, अशी यावर खेळलेल्या खेळाडूंची ओरड आहे. यावर खेळताना जर शरीर घासले गेले तर त्या ठिकाणी भाजल्यासारखी जळजळ होते व काळे व्रण राहतात. मातीच्या मैदानात जशी पायाची मजबूत पकड घेऊन आपले पदलालित्य दाखविता येते. तशी पकड मॅटवर घेता येत नाही. त्यामुळे मॅटवर खेळाडूंचे कमी कौशल्य पाहावयास मिळते. तसेच यावर खेळताना शूज घालून खेळावे लागते. ते किती संघांना परवडण्यासारखे आहे? त्यामुळे बऱ्याच मॅटवर अनवाणी खेळताना खेळाडू दिसतात. ज्या संघांना गणवेश घेण्यासाठी पुरेसे आर्थिक साहाय्य उपलब्ध होत नाही, ते शूज घेण्याकरिता पैसे कुठून उभे करणार?
आज राज्य शासनातर्फे संलग्न प्रत्येक जिल्हा संघटनांना दोन-दोन मॅट उपलब्ध करून दिले आहेत. परंतु मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, सांगली आदी जिल्हा संघटनांकडे जवळपास दोनशेच्या आसपास संघ संलग्न आहेत. त्या सर्वाना आपण मॅटवर सराव देऊ शकतो का? याकरिता लागणारे किट (सामान) घेण्याची ऐपत किती जणांमध्ये असू शकते?
मध्यवर्ती कबड्डी संघटनेला जर मनापासूनच असे वाटत असेल की मॅटशिवाय कबड्डीला पर्याय नाही, तर त्याकरिता प्रथम संघटनेने आपली मानसिकता बदलायला हवी, याकरिता यावर संशोधन व्हायला हवे. या सर्वाचा नीटपणे अभ्यास करण्याकरिता तज्ज्ञांची खास समिती स्थापन व्हायला हवी. त्यामध्ये विद्यमान व माजी खेळाडू, अस्थितज्ज्ञ, डॉक्टर व काही अभ्यासू व्यक्ती असायला हवेत.
या समितीने प्रथम मॅट कशा प्रकारे असावा, तो किती प्रमाणात टणक असावा, त्याच्यावरील आच्छादन कसे असावे ते पाहावे. त्यावर खेळाडूंना चढाई वा क्षेत्ररक्षण करताना पायाची पकड नीट बसते की नाही ते तपासावे. मॅटवर सामने खेळताना, तो मॅट ज्या क्रीडांगणावर अंथरला जाईल ते क्रीडांगण समपातळीत असावे, याकरिता आग्रही असावे. खुल्या मैदानावर मॅट वापरून सामने खेळविल्यामुळे दवाचा त्रास होतो. म्हणून सामने बंदिस्त क्रीडानगरीत खेळविण्याचा प्रयत्न करावा. याकरिता ते स्टेडियम वातानुकूलित असावे व त्याचे तपमान खेळाला पोषक असेच असावे. मॅटवर खेळताना पायाची पकड नीट राहावी म्हणून कोणत्या प्रकारचे शूज वापरावेत याचा विचार व्हावा. आपल्या हाता-पायाची नीट काळजी घेण्यासाठी कोणत्या प्रकारचे अँकलेट, निकॅप वापरावेत याचाही विचार व्हावा. यावर खेळताना खेळाडूंना कबड्डीतील आपले सर्व कौशल्य दाखविता यावे, तसेच मॅटवर खेळताना दम जास्त लागतो. ही दमछाक (स्टॅमिना) वाढविण्यासाठी कोणता व्यायाम घ्यावा यावर संशोधन होणे गरजेचे आहे. शालेय स्तरापासूनच जर खेळाडूंना मॅटवर सराव व सामने खेळावयास मिळाले तर त्याला पुढे आपले कौशल्य दाखविणे सोपे जाईल.
भारतीय हौशी कबड्डी महासंघ अजूनही संभ्रमावस्थेत आहे. आपण दिल्ली येथे २००८ साली झालेल्या राष्ट्रीय स्पर्धा मॅटवर खेळविल्या व यापुढे राष्ट्रीय स्पर्धा मॅटवर होतील हे जाहीर केले. परंतु याच वर्षी कर्नाटक येथील राष्ट्रीय स्पर्धा मातीवर खेळविण्यात आली. हे कोठे तरी थांबले पाहिजे. कबड्डी हा अस्सल भारतीय खेळ आहे. यात आपणास आपले अग्रस्थान कायम ठेवायचे असेल तर आपण आपल्या भूमिकेवर ठाम असायला हवे. कोणत्याही खेळात बदल हा अपेक्षित असतो. बदलाने खेळ सतत चर्चेत राहतो. अधिक लोकप्रिय व लोकाभिमुख होतो. परंतु तो बदल करीत असताना खेळातील गती, कौशल्य व थरार कमी होणार नाही, याची काळजी घेणे जरुरीचे आहे.. तरच काळाच्या ओघात आपला खेळ टिकून राहू शकतो.
शशिकांत राऊत (कबड्डी अभ्यासक)

..तर खेळाचा आत्माच हरवेल!
भारतीय खेळांना आंतरराष्ट्रीय होण्याचे वेध आणि वेड हे पूर्वीपासूनच आहे. प्रत्येक देश आपल्या खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेताना स्वत:चे सत्त्व जपत असतात. मात्र हाच भाग आपले भारतीय खेळ करताना दिसत नाही. हॉकी अ‍ॅस्ट्रो-टर्फवर नेताना तो आंतरराष्ट्रीय झाला, पण देशातूनही त्याचा पािठबा कमी झाला. मॅटवरची कुस्ती आता कुठे हळूहळू रुजू लागली आहे. कबड्डीमध्येही मॅटचे वारे वाहात आहेत. खो-खोबद्दल बोलायचे तर मॅटवर खो-खो खेळताना खो-खोतील मूळ कौशल्यच मरणार हे निश्चित.
   खो-खो हा मॅटवर सर्वप्रथम खेळला गेला तो विद्यार्थी क्रीडा केंद्रावर. पाठोपाठ समता सेवा मंडळावर तो खेळला गेला. हे दोन्ही प्रयोग मुंबईतच झाले, तेसुद्धा तीन-चार वर्षांपूर्वी. त्यानंतर गेली दोन वष्रे राष्ट्रीय पातळीवर खो-खो महासंघाच्या अट्टहासापोटी खेळाडू आणि संघांचा विरोध असताना खो-खोसारखा जलद खेळ मॅटवर खेळवण्यास सुरुवात झाली. गंमत म्हणजे राष्ट्रीय स्पध्रेत पाच मदाने असतील तर जास्तीतजास्त दोन मदानांवरच मॅट दिसायचे. म्हणजे जवळपास बाद फेरीपर्यंत मातीवर खेळणाऱ्या संघांना शेवटचे महत्त्वपूर्ण सामने मॅटवर खेळण्यास अवघड जायचे.
अ‍ॅड. अरुण देशमुख ( खो-खो संघटक)

मातीच्या मदानाच्या तुलनेत मॅटबाबतचे ठळक आक्षेप असे आहेत
१ खो-खो हा जलद खेळ असल्याने धावपटूंना एकदम गती घेण्यास अडचण जाते. यात ऊठ-बस सातत्याने होत असल्याने शून्य वेग ते त्याच्या कुवतीनुसार वेग त्याला गाठायचा असतो.
२ खो-खोमध्ये ‘खो’ देताना अचानक थांबावे लागते. मॅटवर पाय मुरगळणे हे इतके जास्त असायचे की खेळाडू मॅटच्या स्पध्रेत सहभाग घेताना जपून धावतो. मदानावर पाय घासला जातो आणि तो पुढे जातो, त्यामुळे पाय मुरगळणे तुलनात्मक खूपच कमी असते.
३ त्याचबरोबर गुडघा फिरण्याची अतिरिक्त भीती. माती ही ‘शॉकअ‍ॅबसॉर्वर’ आहे. त्यामुळे त्याचा उलट फटका वर सरकत नाही. मात्र गादी तो फटका वर सरकवते.
४ सुंदर झेप हे खो-खो खेळातील सौंदर्य. मॅटवर झेप मारली की ती सरकतच नाही. मुख्य म्हणजे त्यामुळे पाय गतीमुळे मागून वर येतच राहतात आणि पाठीच्या कण्यात खेळाडूला इजा होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे वाघाच्या झेपा मारणारे खो-खोपटू इथे जागच्या जागी मारताना दिसतात. मातीवर कितीही उंचीवरून मारलेली झेप पुढे सरकताना गडीही मिळवून देते, पण महत्त्वाचे म्हणजे शरीराला थेट थांबवत नाही. त्यामुळे खरचटण्यापलीकडे इजा संभवत
नाही.
५ गतवर्षी बारामतीला झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पध्रेत दोन वेगवेगळ्या जाडीच्या मॅटचे मदान करून त्यावर स्पर्धा खेळवत संशोधन करण्यात आले. त्यातील अगदीच कमी जाडीचा मॅट खेळण्यास थोडाफार बरा ठरला. त्याबाबत थोडा अभ्यास करण्याचा प्रयत्न झाला खरा. पण मातीतल्या खेळाचे इथे सौंदर्यच लोपलेले
 होते.
६पुन्हा जरी अशा खास गाद्या बनवल्याच तरी त्या राष्ट्रीय स्पध्रेसाठीच असतील. बाकी सर्व ठिकाणी मातीतच खेळ खेळला जाईल. म्हणजे जिल्हा-राज्य तसेच राष्ट्रीय स्पध्रेत बाद फेरीपर्यंत माती आणि मग मॅट.
७दोन गाद्या या ‘इंटरलॉक सिस्टीम’ने एकमेकांत बसवतात. त्यात अंतर पडते आणि चिकटपट्टी निघत राहते. यात कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होते.
८ सर्वात भयंकर प्रकार म्हणजे या गाद्यांवर सायंकाळी दव सचते व त्यामुळे घसरण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे खेळाडूंना खेळताना घाबरून घाम फुटतो. पूर्ण चिखलातही घसरणार नाही इतके घसरगुंडीचे प्रमाण असते. मातीत कधीच ही अडचण येत नाही. उलटपक्षी मातीतल्या मदानात थोडे पाणी िशपडले जाते. पायाला चांगलीच पकड (ग्रिप) मिळते.

निष्कर्ष
या दोन-तीन फायद्यांसाठी खो-खो खेळ मारला जाऊ नये असे प्रामाणिकपणे वाटते. मॅटवर पडणाऱ्या दवाबाबत जिथे आपल्याकडे उपचार नाहीत, तिथे आपण अभ्यासपूर्ण बदल कसे काय करणार? परंतु राजकीय नेत्यांना आणि खेळातील राष्ट्रीय संघटनांना आपला खेळ हा आंतरराष्ट्रीय होण्यासाठी मॅटवरच तो खेळला गेला पाहिजे असे ठामपणे वाटते आहे, हीच मोठी खंत आहे. फुटबॉल, रग्बी हे खेळ मदानातील मातीवर, गवतावर खेळले जातात. आणि त्या त्या खेळांनी आपापले सौंदर्य जपल्यानेच तो सर्वत्र खेळला जात आहे. त्यामुळेच खो-खो मातीतच खेळला जावा, मॅटवर नाही. नाहीतर खो-खोतील उत्तुंग झेप दिसणारच नाही आणि खऱ्या अर्थाने खो-खो आपला आत्मा हरवून बसेल.

मॅ ट चे  फा य दे
१ खो-खो आंतरराष्ट्रीय होण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
२ मॅटवर
मदान सातत्याने आखावे लागत नाही.
३ मदानाला आखीव-रेखीवपणा येतो.

कुस्ती
..पण मॅटला पर्याय नाही!
कुस्तीत कारकीर्द घडवण्यासाठी मातीवरील सराव उपयोगी पडत असला तरी नोकरी व अन्य पुरस्कार मिळविण्याकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅट्सचा उपयोग अनिवार्य आहे. मातीवरील कुस्तीचा सराव व मॅटवरील कुस्ती याची कशी सांगड घालायची हे प्रत्येक मल्लाने ठरवले पाहिजे. जागतिक कुस्ती महासंघाशी जगातील १७७ देश संलग्न आहेत आणि या सर्वच देशांमध्ये कुस्तीसाठी मॅटचा उपयोग होऊ लागला आहे. या देशांनी मॅटवरील कुस्तीचेच नियम मान्य केले आहेत. कारण आशियाई, राष्ट्रकुल व जागतिक अजिंक्यपद स्पर्धाबरोबरच आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा व ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आदी स्पर्धामध्ये कुस्तीच्या लढती मॅटवरच होत असल्यामुळे ज्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर कारकीर्द करायची असेल
त्याला मॅटच्या कुस्तीची कास धरणे अपरिहार्य आहे.
प्रत्येक देशात कुस्तीबाबत काही परंपरा आहेत. आपल्याकडे मातीवरील कुस्तीची परंपरा आहे. काही
देशांमध्ये वाळूवरील कुस्तीच्या लढती होतात, तर काही देशांमध्ये गवतावरील कुस्तीची परंपरा आहे. मात्र
आंतरराष्ट्रीय स्तरावर जर हा खेळ वाढवायचा असेल तर मैदानाबाबत समानता असणे आवश्यक आहे. त्यामुळेच मॅटचा उपयोग करण्यात आला.
मॅटवर कुस्ती करताना पायाचे घर्षण कमी होऊन लढत अधिक वेगवान होते. शारीरिक क्षमता, लवचिकता
वाढविण्यासाठी मॅटवरील सरावच अधिक उपयोगी होतो. त्याचप्रमाणे मातीपेक्षा मॅटवरील कुस्ती अधिक प्रेक्षणीय वाटते. मॅटवरील मल्लाचा पोशाखही अधिक रुबाबदार वाटतो. पायातील बूट, रंगीत पोशाख यामुळे
खेळाडूंनाही अधिक उत्साहाने लढत खेळावीशी वाटत असते. मॅटवरील कुस्तीपेक्षा मातीवर कुस्ती करताना दुखापत होण्याची शक्यता अधिक असते.
मातीवरील कुस्तीत कारकीर्द करू इच्छिणाऱ्यांना रुस्तुम-ए-हिंद व हिंद केसरी एवढय़ा किताबापर्यंतच सीमित
राहावे लागते. त्यापलीकडे त्यांना जाता येत नाही. जर कुस्तीमधील कामगिरीच्या आधारे नोकरी मिळवायची असेल तर अशा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक पदके मिळविणे आवश्यक आहे. दोन-तीन पदके मिळविली की या खेळाडूंना नोकरी मिळतेच, पण त्याचबरोबर शिवछत्रपती, अर्जुन पुरस्कारासारखे सन्मानही मिळू शकतात.
सुशीलकुमार व योगेश्वर दत्त यांच्यासारख्या मल्लांनी देशातील सर्वोच्च असा ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कारही मिळविला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा व ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये पदकांची कमाई केल्यानंतर पारितोषिकांचाही वर्षांव या खेळाडूंवर होऊ शकतो. सर्वागसुंदर व्यायाम करू शकणारे मल्लच मातीवर चांगल्या रीतीने कुस्ती करू शकतात. मातीवरील कुस्तीत सर्वोत्तम यश मिळविण्यासाठी खेळाडूंना भरपूर मेहनत करावी लागते. ग्रामीण व तालुका स्तरावरील जत्रा, उरुस आदी उत्सवांमध्ये मातीवरच कुस्त्या आयोजित केल्या जातात. अशा माध्यमांद्वारेच कुस्तीचा खेडोपाडी प्रसार व प्रचार होऊ शकतो. ग्रामीण व तालुका स्तरावर प्रत्येक ठिकाणी मॅटवर कुस्ती आयोजित करणे आर्थिकदृष्टय़ा न परवडणारे आहे. अनेक ठिकाणी कुस्ती अकादम्यांमध्ये माती व गादी असे दोन्ही आखाडे असतात. त्यामुळे एकाच वेळी दोन्ही प्रकारच्या आखाडय़ांचा सराव करणे खेळाडूंना शक्य होत असते. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाकरिता असे सराव अनिवार्य असतात.
कुस्ती ही अधिकाधिक देशांमध्ये पोहोचली जात आहे, त्यामुळे दिवसेंदिवस मॅटवरील कुस्तीच अधिक प्रमाणात खेळली जाणार आहे. जर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रगतीची कास धरायची असेल तर मॅटवरील कुस्तीशिवाय पर्याय नाही. तरीही या खेळाचे प्राथमिक ज्ञान झटकन आत्मसात करण्यासाठी मातीवरील सरावही महत्त्वाचा आहे.
 विलास कथुरे
(आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच व प्रशिक्षक)