भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ३२९ धावांपर्यंत मजल मारली. रोहित शर्माचे दीडशतक आणि अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत यांची अर्धशतके यांच्या जोरावर भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. रोहितने १६१ धावा करत धावांचा दुष्काळ संपवला. तर अजिंक्य रहाणेने त्याला उत्तम साथ देत ६७ धावांची खेळी केली. चांगल्या लयीत असणाऱ्या ऋषभ पंतने नाबाद ५८ धावा केल्या. भारताच्या डावात एक मजेशीर गोष्ट घडली.

रोहितच्या तुफानी फलंदाजीचे इंग्लंडच्या माजी कर्णधाराकडून कौतुक, म्हणाला…

भारतीय फलंदाज मैदानात होते. त्यावेळी इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अली सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळण्यास याच सामन्यापासून सुरूवात झाली. त्यामुळे प्रेक्षकही स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्याचवेळी एका प्रेक्षकाने मोईन अलीला हाक मारली. एक-वेळा ‘अली भाई’ ऐकूनही मोईन अलीने दुर्लक्ष केलं. पण नंतर त्याने अखेर हाक मारणाऱ्या प्रेक्षकाकडे पाहिलं. त्यावेळी, साऊथचा सुपरस्टार अजिथ याच्या वेलिमाइ या चित्रपटाबद्दल काही अपडेट आहे का? असा अजब सवाल अलीला विचारण्यात आला. त्यावर मोईन अलीने काहीही प्रतिक्रिया न देता केवळ हातानेच उत्तर दिलं.

IND vs ENG: भारतीय फलंदाजांच्या बाबतीत घडला ‘हा’ अजब योगायोग

दरम्यान, दुसऱ्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. शुबमन गिल (०), चेतेश्वर पुजारा (२१), विराट कोहली (०) हे तिघे स्वस्तात बाद झाले. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी १६२ धावांची भागीदारी केली. रोहित दीडशतक (१६१) ठोकून तर अजिंक्य अर्धशतक (६७) झळकावून माघारी परतला. त्यानंतर ऋषभ पंतच्या नाबाद अर्धशतकी (५८) खेळीव्यतिरिक्त इतर फलंदाजांनी निराशा केली. पंतच्या फटकेबाजीच्या बळावर भारताने ३२९ धावांपर्यंत मजल मारली. मोईन अलीने ४, ओली स्टोनने ३, जॅक लीचने २ तर कर्णधार रूटने १ बळी घेतला.