करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्याच्या घडीला भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूविरोधात लढत आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही करोनामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा खडतर परिस्थितीत करोनासाठी निधी उभारण्यासाठी भारत-पाक सामने भरवावेत, अशी मागणी माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने केली होती.

‘लॉकडाउन’मधील अतिउत्साहींना सेहवागची शालजोडीतून चपराक, म्हणाला…

शोएबने ही मागणी करताच तो चांगलाच ट्रोल झाला. माजी कर्णधार कपिल देव यांनी त्याच्या या प्रस्तावाला थेट केराची टोपली दाखवत आम्हाला अशाप्रकारे निधी जमा करायची गरज नाही, असे स्पष्टपणे सांगितले. त्या पाठोपाठ भारताचे लिटल मास्टर सुनील गावसकर यांनीदेखील हा प्रस्ताव नाकारला. “एकवेळ लाहोरमध्ये बर्फ पडण्याची शक्यता जास्त आहे, पण सध्या भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका शक्य नाही. ICC च्या स्पर्धांमध्ये दोन्ही संघ समोरासमोर येत आहेत, तितपर्यंत ठीक आहे; पण दोन देशांमध्ये द्विपक्षीय क्रिकेट मालिका सध्याच्या घडीला शक्यच नाही”, असे गावसकर एका यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलले होते.

सचिनने घरीच हेअरकट केल्यानंतर विराटने दिलं नवं चॅलेंज

त्यावर गावसकरांना शोएबने ट्विटच्यामार्फत पुराव्यानिशी उत्तर दिले होते. शोएबने एक फोटो ट्विट करत लाहोरमध्ये गेल्या वर्षी बर्फ पडला होता, त्याचा हा फोटो आहे. त्यामुळे या जगात काहीच अशक्य नाही, असं लिहिलं होतं.

अख्तरच्या या उत्तरामुळे गावसकर त्याच्यावर एकदम खुश झाले. त्यांनी एका वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या स्तंभात याबाबत नमूद केले. “अनेकदा भारत आणि पाकिस्तानचे माजी खेळाडू एकमेकांना भेटतात. आमच्यात क्रिकेटवरून बरीच चर्चा होते. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासह पुन्हा भारत-पाक मालिका खेळण्याची इच्छाही व्यक्त केली जाते. पण अशा वेळी तो प्रस्ताव स्वीकारावा की सरळ धुडकावून लावावा ते कळत नाही. रमीझ राजाने जे भारत-पाक मालिकेवर वक्तव्य केलं ते मला समजलं. पण मला सर्वाधिक आवडला तो शोएब अख्तरचा रिप्लाय… त्याने थेट लाहोरमधील बर्फवृष्टीचा फोटोच पोस्ट केला. उत्तम विनोदबुद्धी असलेला वेगवान गोलंदाज असं त्याचं मी वर्णन करेन. त्याने दिलेला रिप्लाय अप्रतिमच होता”, असे गावसकर म्हणाले.