CoronaVirus Outbreak : करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे अनेक लोक करोनातून पूर्णपणे बरे झाल्याचेही सांगितले जात आहे. करोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. मात्र, करोनाच्या भीतीमुळे २४ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान रंगणारी टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय आताच घेणे अतिघाईचे ठरेल, अशी स्पष्ट भूमिका आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बॅश यांनी घेतली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.

काही क्रीडापटूंना ऑलिम्पिक स्पर्धा महत्त्वाची वाटत आहे, तर काही क्रीडापटू सध्या स्पर्धेचा विचार नको अशा भावना व्यक्त करत आहेत. या दरम्यान भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याने मत व्यक्त केले आहे. “सध्या करोना विषाणूमुळे जगभरात जे काही सुरू आहे, त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलावी असंच मला तरी वाटतं. कारण आताचा काळ साऱ्यांसाठीच कसोटीचा आहे”, असं पुनिया म्हणाला.

“ऑलिम्पिक समितीने नियोजित वेळापत्रकानुसार स्पर्धा सुरू केली आणि इतर देशाचे खेळाडू सहभागी झाले तर आम्हालाही जावंच लागेल. पण सध्या तरी त्यांनी परिस्थिती सामान्य होण्याची वाट पाहायली हवी. कारण जिवंत राहिलो तरच खेळू शकतो.. जीव गमवावा लागला तर ऑलिम्पिक खेळून काय उपयोग?”, असं रोखठोक मत पुनियाने व्यक्त केलं.

“मी आता ऑलिम्पिक स्पर्धेबाबत विचार करत नाहीये. आताच्या क्षणी आपल्या सगळ्यांना करोनाचा सामना करणं जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही आमचा सराव थांबवलेला नाही, पण शारीरिक स्वास्थ्यदेखील महत्त्वाचे आहे”, असेही पुनियाने नमूद केले.