भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाची अतिशय खराब सुरुवात झाली. पावसाने व्यत्यय आणल्यानंतर, दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारताने न्यूझीलंडला २३९ धावांवर रोखलं. मात्र २४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली हे अवघी १ धाव काढून माघारी परतले. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या आघाडीच्या फळीतले तिन्ही फलंदाज एक धाव काढून माघारी परतण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

मॅट हेन्रीने लोकेश राहुल आणि रोहित शर्माला यष्टीरक्षक टॉम लॅथमकरवी झेलबाद केलं. तर कर्णधार विराट कोहली ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला.