हर्षद अटकरी

क्रिकेट हा माझा अतिशय आवडता खेळ आहे. दादर, प्रभादेवी, शिवाजी पार्क परिसरातील चाळीतल्या वातावरणात मी लहानाचा मोठा झालो. १९९२ पासून विश्वचषकाचे सामने बघायला लागलो. त्यानंतर विश्वचषक स्पर्धेतील प्रत्येक गोष्टीकडे माझे लक्ष असायचे. त्यामुळे क्रिकेटबद्दलचे अनेक विक्रमही माझ्या आजही लक्षात आहेत. काही दिवसांपूर्वीच आमच्या इमारतीत भारताच्या विश्वचषकातील सामन्यासाठी मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. भारताने आतापर्यंत जिंकलेल्या तिन्ही सामन्यांचा मी आनंद लुटला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा आणि कुलदीप यादव हे यापुढेही चांगली कामगिरी करतील, अशी आशा आहे. सध्या चित्रीकरणात व्यग्र असलो तरी सामने बघायला वेळ काढतोच. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी तर सुट्टीच घेतली होती. भारत उपांत्य आणि अंतिम फेरीत पोहोचेल, त्या दिवशी माझी सुट्टी नक्कीच असेल. आमच्या मालिकेतील अन्य कलाकार बाहेर एकत्र जमून सामना पाहण्याचा बेत आखत आहेत. त्यासाठी मीसुद्धा सज्ज आहे. १९८३च्या विश्वचषक विजेतेपदानंतर क्रिकेटच्या नकाशावर भारताची दखल घेण्यात आली. क्रिकेटमध्ये सध्या भारत अग्रस्थानी असून अन्य खेळांमध्येही देशाचा तिरंगा फडकत आहे.

(शब्दांकन : भक्ती परब)