उपांत्य सामन्यात न्यूझीलंडच्या संघाकडून १८ धावांनी पराभव स्विकारावा लागल्यानंतर भारतीय संघाचं विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. या पराभवाचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे. भारतीय संघात दोन गट पडले असून, निर्णय प्रक्रियेत विराट आणि रोहित यांच्यात मतभेद असल्याची बातमीही नुकतीच समोर आली होती. या परिस्थितीत, भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीवर गंभीर आरोप केले आहेत. विश्वचषक स्पर्धा हरण्यामागे धोनी जबाबदार असून, त्यानेच मुद्दाम भारताला हरवलं असल्याचं योगराज सिंह म्हणाले. News 18 हरियाणा या स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत योगराज यांनी हे आरोप केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही महिन्यांपूर्वीच युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यावेळी योगराज यांनी युवराज क्रिकेटमधून लवकर निवृत्त होण्यामागे धोनी जबाबदार असल्याचा आरोप केला होता. विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर आपण धोनीची पोलखोल करणार असल्याचंही योगराज सिंह म्हणाले होते. त्यानुसार योगराज सिंह यांनी धोनीवर टीकेची राळ उठवली आहे.

“रवी शास्त्री आणि महेंद्रसिंह धोनीला युवराज सिंह विश्वचषक संघात नको होता. महेंद्रसिंह धोनीने जाणूनबुजून या स्पर्धेमध्ये भारतीय संघ हरेल असा खेळ केला. कोणत्याही इतर कर्णधाराच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक जिंकावा हे धोनीला मान्य नव्हतं. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ साली विश्वचषक स्पर्धा जिंकली तेव्हा मोठ्या कालावधीनंतर भारताने विजेतेपद मिळवलं होतं. हा रेकॉर्ड आपल्या नावेच कायम रहावा यासाठी धोनीने असा वागला आहे, आपली खुर्ची टिकवण्यासाठी धोनी कोणत्याही थराला जाऊ शकतो.” News 18 हरियाणा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत योगराज यांनी धोनीच्या खेळीवर गंभीर आरोप केले आहेत.

विश्वचषक स्पर्धेत धोनीला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. अनेक सामन्यांमध्ये आपल्या संथ खेळीमुळे धोनी टीकेचा धनी बनला. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाची पडझड झाल्यानंतर धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. योगराज सिंह यांनी या सामन्यातील धोनीच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “धोनी आणि जाडेजा एकत्र फलंदाजी करत होते. जाडेजा स्ट्राईकवर असताना तो फटकेबाजी करत होता, चौकार-षटकार लगावत होता. धोनीलाही उपांत्य सामन्यात मोठे फटके खेळण्याची चांगली संधी होती, मात्र त्याने ती संधी दवडली. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळताना धोनी आक्रमक फलंदाजी करतो. चौकार-षटकारांची आतषबाजी करतो. मग तो भारताकडून असा खेळ का करत नाही?”

“उपांत्य फेरीच्या सामन्यात जर धोनी रविंद्र जाडेजासारखा खेळला असता तर आपण ४८ व्या षटकापर्यंतच सामना जिंकू शकलो असतो. चेन्नई सुपरकिंग्जला धोनी फटकेबाजी करुन सामना जिंकवून देऊ शकतो, मग भारताकडून खेळताना त्याने हातात बांगड्या भरुन ठेवल्या होत्या का? गेल्या १०-१२ वर्षात धोनीने संघात जे राजकारण केलं, त्याचीच फळं म्हणून त्याला आता लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागतंय. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या मनात धोनीविषयी राग कायम राहिल.” अशा शब्दांत योगराज सिंह यांनी धोनीबद्दलची आपली नाराजी मुलाखतीमध्ये व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket world cup 2019 ms dhoni is responsible for team india early exit in world cup says yograj singh psd
First published on: 15-07-2019 at 07:49 IST