दीपक जोशी

१९७५ आणि १९७९ असे दोन वेळचे विजेते वेस्ट इंडिज व १९९२मध्ये इम्रान खानच्या नेतृत्वाखाली एकदाच विजेता झालेला पाकिस्तानचा संघ विश्वचषक स्पर्धेत एकमेकांविरुद्ध १० सामने लढले. यात वेस्ट इंडिजने सात आणि पाकिस्तानने तीन सामने जिंकले. १९७९ व १९८३ दोन्ही उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजने बाजी मारली, तर एकमेव उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानने बाजी पलटवली. १९९६ व २००३च्या विश्वचषक स्पर्धामध्ये उभय संघांमध्ये सामने झाले नाहीत. १९७५मध्ये पहिल्यावाहिल्या लढतीत वेस्ट इंडिजने पाकिस्तानला दोन चेंडू व एक गडी राखत हरवले होते. पण पाकिस्तानला विश्वचषकात विंडीजला हरवण्यासाठी एक तप प्रतीक्षा करायला लागली. १९८७च्या रिलायन्स विश्वचषकामधील रोमहर्षक लढतीत पाकिस्तानने शेवटच्या चेंडूवर एक गडी राखून विजय मिळविला, तर त्याचवर्षी १४ दिवसांनी वेस्ट इंडिजने त्याची परतफेड केली. त्यानंतर पाकिस्तानला पुन्हा विजय प्राप्त करण्यासाठी बारा वर्षांची तपश्चर्या करावी लागली. १९९९मध्ये इंग्लंड, ब्रिस्टल येथे पाकिस्तानने हा सामना जिंकला. त्यानंतर आणखी १२ वर्षांनी २०११मध्ये ढाका येथे उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिजवर १० गडी राखून मात केली. अशा प्रकारे पाकिस्तान हा एकमेव देश १२ वर्षांच्या अंतराने वेस्ट इंडिजविरुद्ध तीनदा जिंकला. त्यामुळे आज पाहू या कोण जिंकणार?