भारत विरुद्ध अफगाणिस्तान शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने बाजी मारली. मोहम्मद शमीने अखेरच्या षटकात भेदक मारा करत हॅटट्रीकची नोंद करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या पराभवानंतरही सोशल मीडियावर अफगाणिस्तानच्या संघाने दाखवलेल्या झुंजार वृत्तीचं कौतुक होत होतं. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात नियमांचा भंग केल्याप्रकरणी त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सामन्यादरम्यान गरजेपेक्षा जास्त अपील करत पंचांवर दबाव आणल्याप्रकरणी विराटला शिक्षा सुनावण्यात आली आहे. पहिल्याच षटकात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा फलंदाज पायचीत असल्याचं अपील केलं होतं. मात्र पंचांनी हे अपील फेटाळून लावलं. पंचांच्या या निर्णयाविरोधात DRS चा निर्णय घेतल्यानंतर तिसऱ्या पंचांच्या पाहणीत अगदी थोड्या फरकाने अफगाणिस्तानचा फलंदाज नाबाद ठरला. याआधी विराटने गरजेपेक्षा जास्त अपील करत पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. तसेच तिसऱ्या पंचांनीही फलंदाज नाबाद ठरवल्यानंतर विराटने आपली नाराजी व्यक्त केली होती.

विराटची ही वागणुक आयसीसीच्या २.१ नियमांचा भंग असल्याचं समोर आलंय. यासाठी त्याच्या मानधनातली २५ टक्के रक्कम कापून घेण्यात आलेली आहे. या स्पर्धेत भारत आपला पुढचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे.