भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या संघासमवेत इंग्लंड दौर्‍यावर आहे. विराटसेना आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. यानंतर टीम इंडियाला ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौर्‍यावर विराटची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकादेखील आहेत. कुटुंबासमवेत असूनही विराटला आपले पहिले प्रेम आठवले आहे, इतकेच नव्हे, तर त्याने याबद्दल एक प्रेमपत्रही लिहिले आहे.

विराट कोहली त्याच्या फिटनेसविषयी किती जागरूक आहे, हे सर्व चाहत्यांना माहीत आहे. विराट हा सध्या जगातील सर्वात फिट क्रिकेटपटू मानला जातो. यासाठी भारतीय कर्णधाराने खूप काही त्यागले आहे. फिट राहण्यासाठी तो हिरव्या भाज्या आणि प्रथिनेयुक्त आहार घेतो. स्वत: ला अधिक फिट ठेवण्यासाठी, त्याने त्याच्या आहारातून बटाट्यांचा समावेशही काढून टाकला आहे. त्यामुळे आता त्याला बटाट्यांची आठवण येत आहे. बटाट्यांवरील आपले प्रेम दाखवण्यासाठी विराटने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक प्रेमपत्र लिहिले आहे.

हेही वाचा – करोनाग्रस्तांसाठी धावला युवराज सिंग..! ‘या’ राज्याला पुरवली वैद्यकीय सुविधा

 

cricketer virat kohli remembered his first love
विराटचे प्रेम पत्र

 

विराट आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणतो, ”माझ्या प्रिय बटाट्या, मी तूला हे पत्र लिहिण्याचे म्हणजे माझे तुझ्यावर खरे प्रेम आहे. मला अजूनही आपली पहिली भेट आठवते. त्यावेळी मी तूला आलू पराठ्याच्या आतमध्ये बघितले होते. दुकानातून एका खऱ्या चाहत्याप्रमाणे मी तुला घरी घेऊन आलो होतो. मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा मी तुला थिएटरमध्ये भेटायचो आणि स्वत:च्या हातात ठेवायचो. तू सुंदर लाल केचअपमध्ये घातलेला असायचास. तुझ्याशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे, जसे बटाट्याशिवाय कोबी. तुझ्यासोबत मटार असायचा. जेव्हापासून तू निघून गेलास, तेव्हापासून जिरेही अपूर्ण आहे आणि आयुष्य फिके झाले आहे. मला आपला मसालेदार काळ आठवत आहे, बटाट्या. अजून कहाणी बाकी आहे, कारण प्रेमाला कोणताही अंत नसतो.”