भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या फलंदाजीची आज जगभरात प्रशंसा होत आहे. कसोटी, वनडे असो वा टी-20, पंत प्रत्येक स्वरूपात आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. पण असा एक काळ होता जेव्हा महेंद्रसिंह धोनीची जागा घेण्याबाबत त्याच्यावर प्रचंड दबाव होता. निष्काळजी फलंदाजीमुळे आणि नशिबामुळे तो सतत अपयशी ठरत होता. या काळात त्याच्यावर खूप टीका करण्यात आली. याच गोष्टीवर चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज सुरेश रैनाने आपले मत दिले आहे.

पदार्पणात कोणत्या खेळाडूने आपली एक जागा निर्माण केली, या प्रश्नाचे उत्तर देताना रैनाने पंतचे नाव घेतले. रैना म्हणाला, ”पंतच्या फिटनेसबद्दल काही समस्या होत्या. तो अत्यंत वाईट टप्प्यातून गेला. इतका की, मंदिरात असलेल्या घंटीप्रमाणे त्याला कोणीही वाजवून जात होते. परंतु ऑस्ट्रेलियामध्ये तो प्रत्येक डावात चांगली फलंदाजी करत होता. जॅक लीचविरुद्ध तो प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकेल, असे वाटत होते.”

”पंतला मोकळेपणाने खेळण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे”

पंतसारख्या मोठे फटके खेळणाऱ्या खेळाडूला मोकळेपणाने खेळण्याचे स्वातंत्र्य दिले जाणे महत्वाचे आहे. बर्‍याच वेळा जेव्हा तो मोठा फटका खेळताना बाद झाला आहे, तेव्हाही त्याचे समर्थन केले गेले पाहिजे. जसे ब्रायन लारा म्हणायचा, जेव्हा वेळ चांगला असतो, तेव्हा या प्रकारचे खेळाडू खोऱ्याने धावा करतात आणि वेळ खराब असतो तेव्हा या धावा त्या खेळाडूची क्षमता दर्शवितात. त्याला समर्थनाची गरज आहे आणि विराट कोहली ते करत आहे. पंत पुढील 10 ते 15 वर्षे संघाबरोबर राहील, असेही रैना म्हणाला.

दिल्लीच्या कर्णधारपदी पंत

श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर यंदाच्या आयपीएलसाठी दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी भारताचा डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे. दिल्लीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत घोषणा केली.