जागतिक कसोटी अजिंक्यपद गमावल्यानंतर कोहलीचे संकेत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताच्या कसोटी संघाचा योग्य आढावा घेऊन त्यानुसार बदल करण्याची गरज आहे, असे स्पष्टीकरण कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. त्याशिवाय काही खेळाडूंच्या धावा न करण्याच्या वृत्तीवरही कोहलीने खंत व्यक्त केली. साऊदम्पटन येथे झालेल्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने भारताला आठ गडी राखून धूळ चारली. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करूनही मोक्याच्या क्षणी निराशाजनक कामगिरी केल्यामुळे भारताच्या हातून जेतेपद निसटले. त्यामुळे सध्या क्रीडा विश्वात कोहलीच्या नेतृत्वकौशल्याबरोबरच संघातील अन्य खेळाडूंच्या योगदानाविषयी चर्चा रंगत आहेत. कोहलीने मात्र अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या संघाचे समर्थन के ले आहे. ‘‘जागतिक अजिंक्यपदाचा अंतिम सामना गमावल्यामुळे आमचा संघ वाईट ठरत नाही. संघातील प्रत्येक खेळाडूची निवड योग्य होती. मात्र काही कमकुवत बाजूंचा आढावा घेण्याची निश्चितच गरज आहे. ज्याप्रमाणे मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारताकडे प्रत्येक स्थानासाठी किमान दोन ते तीन पर्याय उपलब्ध असतात. त्याप्रमाणेच कसोटी प्रकारासाठी परिपक्व आणि मानसिकदृष्ट्या सक्षम खेळाडूंची फौज तयार करण्यास आमचे प्राधान्य असेल,’’ असे कोहली म्हणाला. ‘‘माझ्यासह सर्वच फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. मात्र संघातील काही फलंदाजांमध्ये धावा करण्याचा दृढनिश्चय दिसला नाही. प्रत्येकाला खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ लागतो, हे मान्य असले तरी यामुळे सामना हातून निसटणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषत: पावसामुळे आधीच खेळ वाया गेलेला असताना फलंदाजांनी अतिबचावात्मक पवित्रा अवलंबणे धोक्याचे ठरते,’’ असेही ३२ वर्षीय कोहलीने सांगितले. सर्वोत्तम तीन अंतिम सामन्यांचा पर्याय योग्य! एखाद्या सामन्यातील सुमार कामगिरीमुळे जेतेपद गमावल्यामुळे कोहलीने नाराजी व्यक्त करतानाच पुढील वेळेपासून सर्वोत्तम तीन अंतिम सामन्याच्या पर्यायाचा अवलंब करण्यात यावा, असे सुचवले. ‘‘अंतिम फेरीतही एकच सामना खेळवण्यापेक्षा किमान तीन लढती असाव्या. या तीन सामन्यांतील कामगिरीवरून तुम्ही आमचा संघ कसा खेळला, याचे आकलन करा. सर्वोत्तम तीन अंतिम सामन्यांमुळे चाहत्यांनाही कसोटी क्रिकेटचा अधिक आनंद लुटता येईल आणि खेळाडूंच्या कौशल्याचा कस लागेल,’’ असे कोहली म्हणाला. त्याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी भारतासाठी एकही सराव सामना आयोजित न केल्याच्या मुद्द्याकडेही कोहलीने लक्ष वेधले. नव्या खेळाडूंना संधी दिल्यामुळे यश -विल्यम्सन गेल्या दोन वर्षांच्या काळात तब्बल २२ खेळाडूंना आलटून-पालटून संधी दिल्यामुळेच आम्हाला अंतिम फेरीसाठी सर्वोत्तम संघ निवडता आला, अशा शब्दांत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने विजयाचे रहस्य उलगडले. ‘‘न्यूझीलंडच्या सर्वोत्तम संघाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धा सुरू झाल्यापासूनच आम्ही या स्पर्धेचे गांभीर्य ओळखून संघबांधणीत सातत्याने प्रयोग केले. प्रत्येक वेळी अनुभवी खेळाडूंवरच विसंबून राहण्यापेक्षा गरजेनुसार नव्या दमाचे खेळाडू कसे योगदान देतील, याकडेही लक्ष दिले. त्यामुळेच अंतिम फेरीत आम्ही यश मिळवू, असा विश्वास निर्माण झाला,’’ असे विल्यम्सन म्हणाला. न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासातील हा सर्वोत्तम संघ म्हणावा लागेल. गेल्या दोन वर्षांत न्यूझीलंडने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. पहिलीवहिली जागतिक कसोटी अजिंक्यपदाची गदा जिंकणे हा न्यूझीलंडसाठी विशेष दिवस आहे. नाट्यमय घडामोडी आणि वळणे घेतलेल्या या कसोटी सामन्यात भारतासारख्या वरचढ संघावर न्यूझीलंडने वर्चस्व गाजवले. - रिचर्ड हॅडली, न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करता न आल्याचा पश्चाताप भारताला नक्कीच होईल. पण संपूर्ण जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान दमदार कामगिरी केल्याचा अभिमान भारताला वाटत असेल. - व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, भारताचा माजी फलंदाज दोन वर्षांपूर्वी याच देशात एकदिवसीय विश्वचषकाने हुलकावणी दिल्यानंतर आता त्याच जोशात पहिलीवहिली जागतिक कसोटी अजिंक्यपदाची गदा जिंकल्याबद्दल न्यूझीलंडचे अभिनंदन. खूपच चांगली कामगिरी केल्याबद्दल केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांच्याप्रतीचा आदर वाढला आहे. - वीरेंद्र सेहवाग, भारताचा माजी सलामीवीर एका चांगल्या बातमीने आजची सकाळ झाली. केन विल्यम्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन. खडतर परिस्थितीतून मार्ग काढत भारतासारख्या बलाढ्य संघावर मात केल्याचा अभिमान वाटत आहे. अनेक वर्षांपासून घेतलेल्या कठोर परिश्रमाचे फळ जगज्जेतेपदाच्या रुपाने अखेर न्यूझीलंडला मिळाले. - मार्टिन गप्तिल,न्यूझीलंडचा खेळाडू