आजपासून सुरू होणाऱ्या देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेत * अश्विन, रहाणे, कार्तिक यांच्यावर निवड समितीच्या नजरा नवी दिल्ली : सध्या भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यासाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या देवधर करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी उत्सुक असलेले फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे व दिनेश कार्तिक यांच्यावर सर्वाचे लक्ष असणार आहे. पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारत अवघे १७ एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यामुळे इतक्या कमी वेळात संघात स्थान मिळवण्यासाठी हे खेळाडू कशा प्रकारे शर्थीचे प्रयत्न करतात, हे पाहणे रंजक ठरेल. त्याशिवाय, एकदिवसीय संघाची घडी आता जवळपास योग्य बसली असल्याने संघाबाहेर असलेल्या खेळाडूंना देवधर करंडकात आपले सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. पुढील महिन्यातील भारत ‘अ’ संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यावरही निवड समिती लक्ष ठेवून असणार आहे. देवधर करंडकात भारत ‘अ’, भारत ‘ब’, भारत ‘क’ असे तीन संघ सहभागी होत असून कार्तिक, श्रेयस अय्यर आणि रहाणे यांच्याकडे अनुक्रमे या तीन संघांचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. २७ ऑक्टोबपर्यंत ही स्पर्धा रंगणार असून स्पर्धेतील पहिला सामना भारत ‘अ’ विरुद्ध भारत ‘ब’ यांच्यात सकाळी ९ वाजल्यापासून दिल्लीच्या फिरोज शाह कोटला स्टेडियमवर खेळला जाणार आहे. रवींद्र जडेजाने आशिया चषकात दमदार कामगिरी करून एकदिवसीय संघात पुन्हा स्थान मिळवले. मात्र त्याचा सहकारी अश्विन अद्यापही संघातील स्थानासाठी झटत आहे. विशेष म्हणजे जुलै २०१७ नंतर अश्विनने एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अश्विनचा भारत ‘अ’ संघात समावेश करण्यात आला आहे. या संघाचा कर्णधार कार्तिकने आशिया चषकात बऱ्यापैकी धावा केल्या होत्या, तरीही त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले. ऋषभ पंत भन्नाट फॉर्मात असल्याने कार्तिकची संधी हुकली. याव्यतिरिक्त, भारत ‘अ’मध्ये मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ व करुण नायर यांचाही समावेश आहे. कसोटीतील भरवशाचा फलंदाज रहाणे फेब्रुवारी महिन्यात अखेरचा एकदिवसीय सामना खेळला आहे. संघातील चौथ्या स्थानासाठी रहाणे अंबाती रायुडूला कडवी झुंज देऊ शकतो. ‘क’ संघाचे नेतृत्व करतानाच त्याला स्वत:च्या फलंदाजीवरही लक्ष पुरवावे लागणार आहे. संघ ’ भारत ‘अ’ : दिनेश कार्तिक (कर्णधार), पृथ्वी शॉ, रविचंद्रन अश्विन, अनमोलप्रीत सिंग, अभिमन्यू ईश्वरन, अंकित बावणे, नितीश राणा, करुण नायर, कृणाल पंडय़ा, श्रेयस गोपाळ, शाम्स मुलानी, मोहम्मद सिराज, धवल कुलकणी, सिद्धार्थ कौल ’ भारत ‘ब’ : श्रेयस अय्यर (कर्णधार), मयांक अगरवाल, ऋतुराज गायकवाड, प्रशांत चोप्रा, हनुमा विहारी, अंकुश बैन्स, रोहित रायुडू, कृष्णाप्पा गौथम, मयांक मरकडे, अंकुश नदीम, दीपक चहर, जयदेव उनाडकट, वरुण आरोन ’ भारत ‘क’ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), अभिनव मुकुंद, शुभमन गिल, रविकुमार समर्थ, सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, इशान किशन, विजय शंकर, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, पप्पू रॉय, नवदीप सैनी, रजनीश गुरबानी, उमर नाझिर.